

रहिवाशांनी रात्र जागून काढली
एमएचबी कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी
मालाड, ता. २४ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील एमएचबी कॉलनी परिसरातील चाळींमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
एमएचबी चाळ क्रमांक ७६ मधील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पावसाने उशिरा का होईना पण जोरदार हजेरी लावत पालिकेच्या गटार सफाईच्या कामांची पोलखोल केल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. मालाड परिसरातील अनेक गटारे व नाले तुंबल्याने घाण पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
स्थानिक पत्रकार आणि रहिवासी अब्दुल समद शेख यांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले होते. ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रभर घरातील पाणी उपसण्याचे काम केले. मात्र, परिसरातील गटारे तुंबल्यामुळे घरातील पाणी उपसूनही पुन्हा घरात पाणी साचत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्रभर या समस्येकडे कोणत्याही यंत्रणेने दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मात्र, सकाळी अस्लम शेख यांनी अब्दुल समद शेख यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कर्मचारी पाठवून परिसराची साफसफाई करून घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, स्थानिक नगरसेवक रफिक शेख यांनी या समस्येकडे कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत अब्दुल समद शेख यांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांनी भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना करून गटारे व नाल्यांची नियमित साफसफाई करावी, अशी मागणी केली आहे.