गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव

गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव
Published on

गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा डाव ः राज ठाकरे
बेरोजगारी, अर्थव्यवस्था, उद्योगांच्या पलायनावरून सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती, रोजगार आणि शिक्षणासारखे मूलभूत प्रश्न गंभीर असताना जनतेला जातीय आणि धार्मिक वादांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे. त्यातून आगामी गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील सुजाण नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता. ६) ठाण्यात केले.
दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी गडकरी रंगायतन येथे मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशात आणि राज्यात काय घडत आहे, याची वस्तुस्थिती मांडण्यासाठी तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले. सुमारे तासाभराच्या भाषणात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारपासून सण-उत्सव, मतदार यादी आणि भाषेच्या वादापर्यंत विविध मुद्द्यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला.
देशात सध्या सर्वत्र ‘धर्माची झिंग’ निर्माण झाल्याचे सांगत ठाकरे यांनी धार्मिक भावनेच्या अतिरेकावर टीका केली. देवावरील श्रद्धा आणि धर्माचा अभिमान असावा; मात्र धर्माची झिंग आणि धर्मांधता असता कामा नये, असे ते म्हणाले. धार्मिक वादांमध्ये तरुणांना गुंतवून ठेवण्याऐवजी रोजगार, शिक्षण आणि अन्य मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरजही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

जीडीपीची आकडेवारी फसवी
सरकारकडून ७.८ टक्के जीडीपीचा दावा होत असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती काय, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. अर्थव्यवस्था मजबूत असेल, तर नागरिक, तरुण आणि उद्योगपती परदेशात का जात आहेत, असा प्रश्न त्यांनी केला. २०२१ ते २०२६ या काळात ५०३ विदेशी कंपन्यांनी भारतातील व्यवसाय बंद केल्याचा दावा त्यांनी केला.

एसआयआरच्या यादीवरून प्रश्न
एसआयआरची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून राज्यातील दोन कोटी मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा ठाकरे यांनी केला. या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण देताना इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार सापडत नसतील किंवा मयत झाले असतील, तर २०२४च्या निवडणुकीत मतदान कोणी केले, असा सवाल त्यांनी केला.

मोदींचा फोटो दुसऱ्या रांगेत
अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवले होते. त्याविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या रांगेत दुसरे कोणी बसू शकत नाही. सरकारी कार्यालयात पंतप्रधानांचे छायाचित्र असावे; मात्र ते दुसऱ्या भिंतीवर असावे, या रांगेत नको, असे ते म्हणाले. नवी मुंबईत होणाऱ्या हिंदी संमेलनात गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असले तरी त्यांची हिंदी सुधारणार नाही, अशी खोचक टीका करताना या संमेलनाकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला त्यांनी या वेळी मनसैनिकांना दिला.

सणांचा दणदणाट कशासाठी?
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या वाढत्या वापरावरही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याऐवजी इतर राज्यांतील प्रथा स्वीकारल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. इतर ठिकाणच्या गोविंदांमध्ये महिलांना स्टेजवर नाचवले जात असताना ठाण्यात मनसेच्या दहीहंडीत ‘महाराष्ट्र गीत’ दुमदुमले, याचे कौतुकही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com