किल्ल्यावर सेल्फी काढणे धोकादायकच.
किल्ल्यावर सेल्फी काढणे धोकादायकच!
रेवदंडा, ता. १८ (बातमीदार)ः रेवदंडा येथील ऐतिहासिक आगरकोट किल्ला हा किल्ला पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. इतिहास अभ्यासक तसेच पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात भेट देत असतात, मात्र किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी जीर्ण व पडझड झालेली असल्याने येथे सेल्फी काढणे जीवघेणे ठरत आहे.
तटबंदीवर जाऊन फोटो काढण्याचा मोह अनेक पर्यटकांना आवरता येत नसल्याने या ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत. याच वर्षी १६ ऑगस्ट रोजी पुणे येथील ५७ वर्षीय अबोली देशपांडे या कुटुंबासह किल्ल्याला भेट देण्यासाठी आल्या असताना फोटो काढत असताना त्यांच्या डोक्यावर दगड पडला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी अलिबाग येथे हलविण्यात आले होते.
याशिवाय, मागील आठवड्यात निगडी-पुणे येथील १७ वर्षीय पर्यटक युवकाचा किल्ल्यात खेळताना अपघात झाला. त्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी अलिबाग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात पुरातत्त्व विभाग (अलिबाग कार्यालय) येथील सहाय्यक संवर्धन अधिकारी बजरंग येलीकर यांनी सांगितले की, किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी कमकुवत झाली आहे. पर्यटकांनी तटबंदीवर जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नजीकच्या काळात सूचनाफलक लावण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, तटबंदी दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

