मुंबई : मला बोरीवलीमधून तिकीट का नाही दिले याचे मी आत्मपरीक्षण करत आहे. मला असे वाटते की, पक्षही याचा विचार करेल. पक्षाचे काही चुकले असेल तर पक्षही याबाबत विचार करेल. पण आज निवडणुकीच्या काळामध्ये कोणाचे चुकले कोणाचे बरोबर आहे, ही विचार करण्याची वेळ नाही, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वंयसेवक आहे. विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आम्ही राजकारणामध्ये ही स्वयंसेवक आणि कार्यकर्ता म्हणून काम करतो. हे करत असताना खरा उद्देश आणि लक्ष्य आहे ते राष्ट्र निर्माणाचं. समाज कल्याणाचे. आमदारकी असेल, विरोधी पक्ष नेता असेल, पक्षाचा अध्यक्ष असेल, सरचिटणीस असेल किंवा मंत्री असेल, ही मधली स्टेशन्स् आहेत. आपल्याला यातून समाजहित करायचं आहे. तळागळातल्या माणसांसाठी काम करायचं आहे.
तिकीट का नाही मिळाले याची चर्चा निवडणुकीनंतर मी पक्ष श्रेष्ठींबरोबर आवर्जुन करेन. जर, माझे काही चुकले असेल तर दुरुस्त करेन. कारण, माझ्याविषयी काही चुकीच्या माहितीपोटी निर्णय झाला असेल तर तो पण दुरुस्त करेन.
या निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने भारतीय जनता पक्ष आणि महायुती जिंकली पाहिजे, यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. आपल्या सगळयांना शिकवलंय की, ‘नेशन फर्स्ट, पार्टी नेक्सट, सेल्फ लास्ट’. त्यामुळे तावडे पवारांना भेटले का? तावडे अपक्ष उभे राहणार का? हा विचारही माझ्या मनाला शिवत नाही आणि मला असे कोणी विचारूही शिकत नाही. की तुम्ही आमच्या पक्षात येता का? कारण, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपशी असे काही एकनिष्ट आहोत की, त्यामुळे लोकांना हे सर्व माहिती आहे.
मला या निवडणुकीमध्ये तिकीट मिळाले नाही म्हणून अनेकांचे महाराष्ट्रातून फोन आले. अनेक पदाधिकाऱ्यांचे अस्वस्थ होऊन फोन आले. या सगळयांना मी हेच सांगितले की, आता निवडणूक आहे. दिवस खूप कमी आहेत. 21तारखेला मतदान आहे. त्यासाठी सगळयांनी झटून काम करुया दोन तृतीयांश बहुमताने भाजप महायुतीला जिंकवूया.
गेल्या 5 वर्षांत मंत्री पदावर असताना अनेक चांगल्या गोष्टी, अनेक चांगले उपक्रम, बदल केले. ज्याच कौतुक सर्वांनी केले. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मुंबईत जे भाषण केले, त्यामध्ये देशभरात शिक्षणाच्या क्रमवारीत सोळाव्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आणले. याचा आवर्जून उल्लेख केला. ‘पुस्तकाचं गांव’ प्रकल्प असेल, अटल स्मृती उद्यान असेल, असे अनेक उपक्रम उत्तमरीत्या राबविले. त्यामुळे मंत्रीपदाच्या कार्यकाळात असे काही झाले असते तर त्यावेळी बोलण्याची आमची पध्द्त आहे. पण असे काही बोलणे झालेले नाही. पण ज्या अर्थी पक्षाला असे वाटते की, त्यांच्याकडे काही तरी माहिती असेल तर मी त्यांच्याशी बोलेन आणि ते जर चुकीचे असेल तर पक्षही दुरुस्त करेल.
मुख्यमंत्री आणि चंद्रकांतदादा पाटील हे माझ्यासाठी व प्रकाश मेहता यांच्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी खूप मदत केली. पण पक्षाचे एक पार्लमेंट्री बोर्ड असते त्या निर्णयाप्रमाणे पक्ष चालतो.
मुळात पक्षात असे कोणी स्पर्धक नाहीत. पक्षाचे हायकमांड यामध्ये निर्णय घेत असतात. त्यामुळे आम्ही एक टीम म्हणून काम करते असतो. कोण कुणाचे स्पर्धक अजिबात नाही.
मला माहिती नाही आणि आता निवडणुकीमध्ये वेळ नाही ते विचारायला. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर आवर्जून मा. अमितभाई, संघटक मंत्री संतोष कुमारजी यांची भेट देईन आणि चर्चा करेन. पार्लमेंट्री बोर्ड हा निर्णय करते. त्याप्रमाणे हे निर्णय होतात. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर त्यांच्याशी नक्की बोलेन.
मला असे वाटते की ही, कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी चाललेली ही चर्चा आहे. कारण मी विधान परिषदेतून विधान सभेत आलो. त्यामुळे, विधान सभेत आल्यानंतर पुन्हा विधान परिषदेत जाऊ आणि अमूक करु. हे माझ्याविषयी प्रेम वाटणाऱ्यांनी व्यक्त केलेले प्रेम आहे. शेवटी पक्ष जो निर्णय घेईन ती जबाबदारी पार पाडेन.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.