न्यायालयीन आदेशाचा भंग; राणा दांपत्याकडून नाही, कायदेपंडितांचे प्रथमदर्शनी मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Violation of court order not from navneet Rana ravi rana social media mumbai

न्यायालयीन आदेशाचा भंग; राणा दांपत्याकडून नाही, कायदेपंडितांचे प्रथमदर्शनी मत

मुंबई : राणा दांपत्याने जामिनावर सुटका झाल्यानंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्याने सर्वसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असले तरी त्यांनी पत्रकारांशी इतर विषयांवर चर्चा करणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत नाही, असे मत कायदेपंडित व्यक्त करीत आहेत. राणा दांपत्याला जामीन देताना त्यांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलू नये, अशी अट न्यायालयाने लादली होती. मात्र तरीही राणा दांपत्याने प्रसारमाध्यमांना मुलाखती देणे सुरु केल्याने तो अटीचा भंग आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे. या गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही विषयावर नवनीत राणा व रवी राणा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे सत्र न्यायालयाने ४ मे रोजीच्या जामीन आदेशातील मुद्दा क्रमांक तीन मध्ये म्हटले आहे.

त्यांना फक्त त्या प्रकरणाशी संबंधित म्हणजे भोंगे, अजान, हनुमानचालिसा आदी विषयांवर बोलण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. अन्य विषयांवर ते प्रसारमाध्यमांशी बोलू शकतात, त्यांना सरसकट प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई नाही. किंबहुना असा सरसकट मनाई आदेश देता येत नाही, अशी प्रतिक्रिया मान्यवर वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केली. संबंधित गुन्हा परत करण्यास किंवा लोकांना प्रक्षोभित करणारी विधाने करण्यासही त्यांना बंदी आहे. या अटीचा भंग करणारी विधाने राणा दांपत्याने केल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत नसल्याचेही सरोदे म्हणाले. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे, ते प्रकरण आणखी वाढू नये, म्हणून त्या प्रकरणावर प्रतिक्रिया न देण्याची अट सामान्यतः लादली जाते. संपूर्णपणे भाषणबंदीचा आदेश दिला जात नाही. त्यामुळे संशयित व्यक्ती त्या अटीचा भंग न करता इतर विषयांवर बोलू शकतात, असे वकील उदय वारुंजीकर म्हणाले. अशा अटी जर संबंधितांना मान्य नसतील तर त्या उठविण्यासाठी ते न्यायालयात अर्ज करू शकतात, असेही वारुंजीकर यांनी दाखवून दिले.

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना, कोर्टाने घालून दिलेल्या अटीचा भंग केला आहे. मी व्हिडीओ क्लिप बघितल्या त्यावरून माझी खात्री पटली आहे. कोर्टाने जामीन देताना स्पष्ट केलं होत कि कोर्टाच्या अटीचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द होऊ शकतो. आम्ही कोर्टात सरकारच्या वतीने दोघांचा जामीन रद्द करण्याची मागणी सोमवारी कोर्टाकडे करणार आहोत. हे आमचे कर्त्यव्य आहे.

- प्रदीप घरत ,विशेष सरकारी वकील

दोघांनीही अशा स्वरूपाची विधान केली आहे. व रेकॉर्ड नवनीत राणा : हनुमान चालीसा वाचण्यासाठी 12 वर्षे तुरुंगात जायला मी तयार आहे. असं आज म्हणाल्या...