Mumbai News : गारगई आता मुंबईची तहान भागविणार...

नव्या वर्षात होणार धरणाच्या कामाला होणार सुरूवात
gargai project mumbai
gargai project mumbaisakal

मुंबई - गारगई प्रकल्प मुंबईतील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) जलअभियंता (प्रकल्प) विभागाने तयार केला असून केंद्राच्या पर्यावरण आणि वन्यजीव विभागांच्या परवानग्या मिळाल्यास टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. नवीन वर्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात केली जाईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दै. सकाळला दिली आहे.

पालिकेत शिवसेनेची सत्ता होती. आता पालिका प्रशासकाच्या ताब्यात आले. केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने गारगई आणि पिंजाळ या दोन मोठ्या पाणी पुरवठा प्रकल्पांसाठी पालिकेला अडचणी येत होत्या.

आता राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार असल्याने केंद्राकडून विविध परवानग्या घेण्यात अडचणी येणार नाहीत असा विश्वास अधिका-यांना वाटत आहे. गारगई प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारच्या वन्य जीव आणि वन विभाग या दोन खात्यांच्या परवानग्यांची आवश्यक्ता आहे.

या परवानग्या मिळाल्यास टेंडर प्रक्रिया लगेच केली जाईल, तसेच जानेवारीमध्ये गारगई धरणाच्या कामाला सुरूवात होईल, अशी माहिती जलअभियंता (प्रकल्प) विभागाच्या अधिका-यांनी दिली. पर्यावरण खात्याची या प्रकल्पाला मंजूरी मिळाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राजकारणाचा प्रकल्पाला फटका

गारगई प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. केंद्राकडे परवानग्या मिळण्यासाठी पालिकेचा पाठपुरावा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पक्षांतर्गत राजकारणाचा प्रकल्पांना फटका बसत असल्याची चर्चा पालिकेच्या अधिका-यांमध्ये सुरू आहे.

राज्य सरकारच्या नियंत्रणात पालिका आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार आहे. त्यामुळे राज्य सरकाराने या प्रकल्पासाठी परवानग्या मिळविण्यासाठी प्रयत्न केल्यास या प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरूवात करता येईल, असे पालिकेच्या अधिका-यांना वाटत आहे.

६९ मीटर इंचीचे धरण

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे हे धरण असून त्याची लांबी ९७२ मीटर असेल.

असा असेल बोगदा

गारगाई ते मोडकसागर तलावादरम्यान दोन किमी लांबीचा भूमिगत बोगदा खोदण्यात येणार आहे. गारगाई धरणातील पाणी या बोगद्याद्वारे मोडकसागर तलावात आणून ते सध्या अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्यांमधून मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली. त्यामुळे पाणी वाहून नेण्याच्या खर्चात मोठी बचत होणार आहे.

भुसंपादन प्रक्रिया सुरू

महापालिकेने गारगाई पाणी प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वाडा तालुक्यातील ओगदे व खोडदे या गावातील ४२६ हेक्टर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चितळे समितीची शिफारस

जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे समितीच्या शिफारसीनुसार पालिकेने गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र विविध सरकारी परवानग्या, प्रकल्पाचा अभ्यास यामध्ये दहा वर्ष गेली. या प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्याचे पालिकेने ठरवले आहे.

बाधित क्षेत्र

गारगई प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदे आणि खोडदे ही गावे बाधित होणार आहेत. तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशत: बाधित होतील. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ८४० हेक्टर क्षेत्रापैकी ७३ हेक्टर क्षेत्र नदीखाली आहे तर ५९७ हेक्टर वनजमीन असून १७० हेक्टर खासगी जमीन आहे.

पूनर्वसनासाठी पालिका करणार जमीन खरेदी

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ३६५ हेक्टर जागा वाडा मनोर मार्गाजवळील देवळी गावाजवळ निश्‍चित करण्यात आली आहे. त्याला प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. सांगण्यात आले आहे. पालिकेने प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनासाठी जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

"पिंजाळ"चाही पाठपुरावा सुरू

मुंबईची तहान भागविणारा गारगई पाठोपाठ पिंजाळ प्रकल्प पालिका हाती घेणार आहे. पिंजाळ या प्रकल्पाचाही सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने तयार केला आहे. या प्रकल्पासाठीही परवानग्या मिळाललेल्या नाहीत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. गारगई प्रमाणे या प्रकल्पासाठीही टनेल खोदले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com