
मुंबई : "मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला जमीन दाखविण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना अस्मान दाखवून देऊ," अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, असेही त्यांनी नमूद केलं. ‘मातोश्री’ निवासस्थानी आज शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली त्यामध्ये भास्कर जाधव, अरविंद सावंत आदी सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे यांनी नेत्यांशी संवाद साधला. (We will show sky to those who show land to Shiv Sena Uddhav Thackeray reply to Amit Shah)
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होईल आणि तेव्हा मला जे बोलायचे ते बोलेनच असे स्पष्ट करत, मागच्या दसरा मेळाव्याचा उल्लेख केला. ठाकरे म्हणाले, ‘‘आतापर्यंत बोलताना तोंडावर मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा. त्यामुळं जरा जपूनच बोलावं लागायचं. यावेळी जे सुचेल, जे बोलायचे ते मी बोलेन’’
मुख्यमंत्रिपदाची हाव असती तर क्षणात पद सोडलं नसतं
अमित शहा यांनी सोमवारच्या भाषणात युतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अडीच वर्षांबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. तशा प्रकारचे कोणतेही आश्वासन भाजपकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आले नव्हते पण तरीदेखील शिवसेनेने धोका दिल्याचा आरोप केला होता. यावरही नाव न घेता उद्धव ठाकरेंनी शहांवर निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रिपदाची हाव असती तर क्षणात पद सोडलं नसतं. ममता बॅनर्जी यांच्याशीही माझी ओळख होतीच ना. मी सगळ्यांना कोलकत्याला घेऊन गेलो असतो. तिकडे कालिमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं, पण तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणं याला राहाणं म्हणत नाहीत. मी सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आहे, ज्यांना सोबत राहायचं त्यांनी निष्ठेनं राहावं’’
भास्कर जाधवांवर विश्वास
उद्धव ठाकरेंनी यापुढच्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचं सांगितलं. तसेच आमदार भास्कर जाधव यांना तुमच्याकडून महाराष्ट्राला भरपूर अपेक्षा आहेत, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.