निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 'का' आहेत खासदार सुनील तटकरे नाराज ? असं काय घडलं की...

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 'का' आहेत खासदार सुनील तटकरे नाराज ? असं काय घडलं की...

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत प्रशासनाकडून वस्तुनिष्ट माहिती देण्यात आली नसून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे मत खासदार सुनील तटकरे यांनी रोहा पालिकेच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, उपनगराध्यक्ष समीर सकपाळ तसेच रोहा नगरपालिका नगरसेवक उपस्थित होते.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या रायगड जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीबाबत समर्पक आकडेवारी न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्राथमिक मदत म्हणून 50 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याची नाराजी अप्रत्यक्षरीत्या तटकरे यांनी नुकसानीबाबत प्रशासनाने दिशाभूल केल्याचे सांगत दाखवून दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली हे तालुके तसेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, मुरूड, म्हसळा, अलिबाग, रोहा, तळा, पेण हे तालुके या वादळात मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाले आहेत. या तालुक्यात जनजीवन सुरळीत करण्यासाठी काही हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच नुकसानीचे प्रचलित नियम बाजूला ठेवून विशेष बाब म्हणून निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर घरांच्या अंशतः नुकसानीसाठी सहा हजारऐवजी पंधरा हजार तर घरांचे संपूर्ण नुकसान झाले असल्यास 95 हजारऐवजी दीड लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

फळबाग नुकसानीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नारळ, सुपारी, आंब्याच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्यांची साफसफाई  करण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून निधी दिला जाईल. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या बागा पुन्हा उभारण्यासाठी मदत केली जाईल, असे सांगितले. पर्यटन व्यवसाय कोरोना व निसर्ग चक्रीवादळामुळे पूर्णतः ठप्प झाला आहे. या व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन, सवलतीच्या दरात वीजपुरवठा तसेच व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्जपुरवठा याबाबींवर विचार चालू असल्याचे सांगितले आहे.

नियमित कर्ज परतफेड करणारे अनेक शेतकरी या वर्षी पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. त्यांना प्रोत्साहन अनुदान मिळावे तसेच चालू हंगामात पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले आहे. तसेच मागील वर्षभरात अतिवृष्टी, कोरोना, निसर्ग वादळ यामुळे मच्छीमार उदध्वस्त झाला आहे. कोळी समाज संकटात सापडला आहे अशा वेळी त्यांना विशेष पॅकेज जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून, वीज मंडळांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यासाठी मेहनत घेत आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अन्य जिल्ह्यातून टीम मागविण्यात आल्या असून, पुढील आठ दिवसांत पुरवठा सुरळीत होईल, अशी आशा तटकरे यांनी व्यक्त केली.

why member of parliament sunil tatkare is unhappy read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com