रायगडमधील राजकीय समीकरणात बदलाचे वारे! जिल्हा परिषदेत उलथापालतीचे संकेत; राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र

रायगडमधील राजकीय समीकरणात बदलाचे वारे! जिल्हा परिषदेत उलथापालतीचे संकेत; राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र



अलिबाग : रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत भविष्यातील राजकीय तडजोडीसाठी कार्यकर्त्यांमध्ये वातावरण निर्मिती करीत आहेत. यामुळे रायगडमधील राजकीय समीकरणांत बदल होत असल्याने भविष्यात येथील सत्तेतही पडसाद दिसण्याचे संकेत दिले जात आहेत. 

शिवसेना हा आताच्या घडीला सर्वांत मोठा पक्ष म्हणून जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजप दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक, आणि अपक्ष एक असे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील समीकरण बदलून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली. जिल्ह्यात या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा उच्च स्तरावर झाली असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यासाठी गुरुवारी मुंबईत झालेल्या मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या भेटीचा दुजोरा हे कार्यक्रर्ते देत आहेत. बैठकीला रायगडच्‍या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्‍यासह शिवसेनेचे निवडक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी झालेल्‍या चर्चेत मुख्‍यमंत्र्यांनी दोन्‍ही पक्षांनी समन्‍वयाने काम करावे, अशा सूचना दिल्‍या. आगामी काळात राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना पुढील निवडणुका एकत्रितपणे लढणार असल्‍याचा निर्णय या बैठकीत झाल्‍याची हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जिल्हा परिषदेत शेकाप एकाकी पडण्याची शक्यता आहे. सध्या रायगड जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 18, शेकाप 23, राष्ट्रवादी 12, भाजप चार आणि कॉंग्रेस दोन असे पक्षीय बलाबल आहे. 59 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादीला एकत्र येत 30 चे किमान बहुमत सिद्ध करता येऊ शकणार आहे. 

जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरण
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव आहे. अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले पद या वेळी शेकापच्या योगिता पारधी यांना देण्यात आले आहे. जर सत्ताबदल झाला तर निजामपूर मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या वासंती वाघमारे यांना उर्वरित कालावधीसाठी अध्यक्षपदावर संधी मिळू शकते.

जिल्ह्यात हे दोन पक्ष एकत्र आल्यास जिल्ह्याच्या विकासाची गंगा वाहू शकते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असतील तर ही स्वागतार्ह बातमी असून, आम्ही त्याचे स्वागत करीत आहोत. 
- राजा केणी,
अलिबाग शिवसेना तालुकाप्रमुख

----------------------------------

भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी कदाचित ही चर्चा झाली असावी. तसे वरिष्ठ पातळीवर आदेश आल्यास येथील कार्यकर्ते काम करण्यास तयार आहेत.
- जगदीश घरत,
जिल्हा चिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस

-------------------------------------------------- 

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com