Mumbai : पनवेल तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panvel Education

Mumbai : पनवेल तालुक्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ

नवीन पनवेल : एकीकडे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत; तर दुसरीकडे पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०५ शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे एका शिक्षकावर दोन वर्ग घेण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील २९ शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक असल्याने खासगी शाळांशी स्पर्धा करणेसुद्धा कठीण झाले आहे.

सध्या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेण्याचा पालकांचा कल असतो. ग्रामीण भागातील पालकदेखील मुलांच्या भविष्यासाठी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्याचा परिणाम पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येवर होत आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांसमोर मोठी आव्हानात्मक स्थिती आहे. अशातच या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सध्या पनवेल तालुक्यामध्ये २४८ रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा असून या ठिकाणी ९०५ शिक्षकांची मंजूर पदे आहेत. त्यापैकी ८४५ पदे भरण्यात आली आहेत. मात्र, अजूनही १०५ शिक्षकांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम एकूणच शिक्षण व्यवस्थेवर होत आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या शिक्षकांना दोन वर्ग शिकवावे लागत असल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही झाला आहे. शिवाय पटसंख्या घसरण्यासही ते कारण ठरत अाहे.

तंत्रस्नेही शिक्षकांना इतर कामे

तंत्रस्नेही शिक्षकांना शाळेऐवजी ऑनलाईन कामांमध्ये व्यस्त करून घेतले जाते. वर्षातून अनेकदा त्यांना ऑनलाईनची कामे दिली जातात. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. तसेच निवडणूक, जनगणना यांसारख्या अतिरिक्त कामांमुळे शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.

निवृत्ती, जिल्ह्याबाहेर बदल्यांमुळे तफावत

गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक शिक्षक निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर नव्याने शिक्षक नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर बाहेरच्या जिल्ह्यात बदली होऊन गेलेल्या शिक्षकांची संख्याही जास्त आहे. बाहेरून येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळेही तफावत निर्माण झाली आहे.

पनवेल तालुक्यात शिक्षकांची संख्या कमी आहे, हे वास्तव आहे. काही शिक्षक निवृत्त झाले आहेत, तर काहींच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची संख्या कमी असली तरी शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ देत नाही. लवकरच शिक्षकांची पदभरती होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे.

- सीताराम मोहिते, गट शिक्षणाधिकारी, पनवेल