स्वतःचा मित्र बना! ; शोध स्वतःचा

दिवसभरात अनेक विचारांच्या-भावनांच्या गर्दीतून वाटचाल करत आपली कामं करत असतो.
स्वतःचा मित्र बना! ; शोध स्वतःचा

आपण दिवसभरात अनेक विचारांच्या-भावनांच्या गर्दीतून वाटचाल करत आपली कामं करत असतो. ऑफिस असो किंवा घर, बाहेर फिरायला गेले असू किंवा पुढच्या आयुष्याचा विचार करत नियोजन करत असू. कोणतेही कर्म करताना किंवा काहीही न करतानासुद्धा विचार चालूच असतात. या विचारांचा दंगा वाढायला लागल्यावर झेपेनासं होतं, भारावून जायला होतं (ज्याला इंग्रजीत overwhelm म्हणतात), छातीवर दडपण जाणवू लागतं - अशा परिस्थितीत विचारांना शांत करणं हा एक मार्ग तर आहेच; पण हाताची पाच बोटं सारखी नसतात, तसं प्रत्येक वेळी एकच उपाय उपयोगी पडेल असं नाही. त्यातूनही आपलं मन पाळीव प्राण्याइतकं आदबीनं राहतं का? जिममध्ये मसल ट्रेन करतो तसं मनाला आवर घालून स्वयंप्रेरणेनं वळवता यावं, याचीही प्रॅक्टिस करावी लागते.

मन शांत करण्यासाठी...

आजच्या लेखात आणखी एका पद्धतीने हे गांगरून-भारावून गेलेलं मन शांत कसे करू शकतो ते पाहू. आपण एकटे असतो आणि मन चलबिचल होत असेल, कुठंतरी अडकल्यासारखं वाटत असेल किंवा गोंधळून जायला झालं असेल तर आपण फोन उचलतो आणि आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो. मग ती व्यक्ती आपले आई-वडील, भाऊ-बहीण, जवळचा मित्र किंवा मैत्रीण असते. जे आपल्याला जवळून ओळखतात, आपल्याला समजून घेऊ शकतात असं आपल्याला वाटतं त्यांच्याशी बोललं की ‘बरं वाटतं!’... हो की नाही?... असं ‘बरं वाटलं’ की काय होतं? मन काहीअंशी शांत होतं आणि आपण जरा नीट-स्पष्ट विचार करू शकतो. कधी आपल्याला सल्ला हवा असतो, कधी आपल्या विचारांना फक्त दुजोरा हवा असतो किंवा फक्त कोणापाशी तरी नुसतं व्यक्त झालं तरी छान वाटतं.

असं करणं आवश्यक आणि योग्यही आहे, परंतु प्रत्येकवेळी कोणीतरी बोलायला व भेटायला मिळेलच असं नाही. आपल्याला समजून घेणारी जवळची माणसं असणं गरजेचं असलं, तरी आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी आपण कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही. अशा वेळी काय करता येईल? अशा वेळी तुम्ही एकटे नाही, हे आधी स्वतःला सांगा आणि तुमच्या आतल्या आवाजाला तुमचा ‘सखा’ बनवा. असा सखा (सखी) ज्याच्याशी तुम्हाला मोकळेपणाने बोलता येईल, सल्ला-मसलत करता येईल, गरज पडेल तेव्हा ‘जरा थांब, घाई करू नकोस,’ असेही तो आश्वासक बोलेल आणि विचारांना योग्य चालना देईल. आपला आतला आवाज खूप शहाणा असतो. त्याला सगळं कळत असतं. त्याचं फक्त ऐकायला शिकलं पाहिजे. अनेकदा आपल्याला उत्तरं माहीत असतात, नुसतं व्हॅलिडेशन हवं असतं. आपलीच विवेकबुद्धी हे व्हॅलिडेशन देण्यास सक्षम असते. मी अमुक करू की तमुक, असा जेव्हा गोंधळ असतो तेव्हा जरा शांतपणे स्वतःबरोबर राहिलात तर याचंही उत्तर आतून आपलाच आवाज देईल.

ज्या वेळी खूप स्ट्रेसमध्ये असाल, कामाचा ताण असेल, कामाची लिस्ट इतकी मोठी असेल की ती पाहूनच टेन्शन येत असेल किंवा अवघड परिस्थिती आली आणि त्यात काय करावं समजत नसेल... तेव्हा स्वतःला विचारा, ‘या परिस्थितीत मला माझ्या सर्वांत जवळच्या मित्रानं किंवा मैत्रिणीनं काय सल्ला दिला असता?’ कधीकधी स्वतःशी बोलण्यानंही प्रश्न सुटतात. उत्तरं कायम बाहेरच मिळतील हे जरुरी नाही. तुम्ही जेव्हा जवळच्या व्यक्तीला त्याच्या गरजेच्या वेळी सल्ला देता, तसा वेळोवेळी स्वतःलाही द्या. आपल्या आई-वडील, भाऊ-बहीण किंवा मित्र-मैत्रिणींप्रती जी प्रेम व करुणेची भावना ठेवतो, संयमानं-धीरानं पाठीशी खंबीर उभे राहतो, तसेच स्वतःच्याही पाठीशी उभे राहायला शिकूया. एकटं कधीच वाटणार नाही आणि मन प्रश्नांमध्ये गुंतून न राहता उत्तरं लवकर सापडतील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com