दोषारोप आणि दुःख

साधकाला एक उच्च पातळीचा समजूतदारपणा आत्मसात करावा लागेल
दोषारोप आणि दुःख

एका सामान्य माणसाला दुःख ग्रासते, तेव्हा तो त्याच्या भोवतालचे लोक, व्यवस्थापन आणि साऱ्या जगालाच दोष देतो. साधकाला दुःख होते, तेव्हा तो साऱ्या जगाबरोबरच त्याचा अध्यात्ममार्ग, त्याला मिळालेले ज्ञान आणि तो स्वतः या साऱ्यांना दोषी ठरवतो. तसे पाहता साधक न असणेच चांगले... कारण तुम्ही कमी जणांना दोषी मानाल. पण त्याचवेळी साधकाला सुख-आनंद अधिक लाभत असतो. म्हणजे त्याच्या आयुष्यात अधिक प्रेम असते आणि अधिक वेदनाही. जेव्हा आनंद अधिक, तेव्हा विरोधाभाससुद्धा अधिक.तर यासाठी अध्यात्म मार्गावरील साधकाला एक उच्च पातळीचा समजूतदारपणा आत्मसात करावा लागेल, ज्यायोगे तो स्वतःस, मार्गास आणि जगास दोषी ठरवणार नाही.

हे तुमच्या लक्षात येत आहे का?

एकदा का या दोषारोप आणि दुःखांच्या घळीवरून पलीकडे उडी घेता आली, की मग खड्ड्यात पडणे शक्यच नाही. ही फार महत्त्वपूर्ण उडी असेल. ईश्वर कधीही तुमची परीक्षा घेत नाही. परीक्षा घेणे हा अज्ञानाचा भाग झाला. परीक्षा घेऊ पाहणारा कोण असेल? ज्याला तुमच्याबद्दल काही गोष्टी माहीत नाहीत तो. ईश्वराला तर तुमची क्षमता माहीत आहे. मग त्याला तुमची परीक्षा का घ्यावी लागेल? तर मग दुःखं असतातच का? कशासाठी? तुमच्यातील तितिक्षा म्हणजे सहनशीलता वाढवण्यासाठी दुःखांचे प्रयोजन असते... आणि प्रार्थनामय समर्पणाच्या साहाय्याने सहनशीलता वाढवता येते. शिवाय तुमच्या सहनशीलतेला आव्हान करणाऱ्या घटनांनी!

मोह माया

मोहामुळे आपला श्वास अस्थिर होतो आणि अस्थिर श्वासामुळे मनःशांती भंग होते. यामुळे आपले आयुष्य विस्कळित होते आणि आपण दुःखी होतो. आपल्या अस्तित्वाचे अनेक तुकडे होऊन विस्कटून जाण्यापूर्वी त्यांना पुन्हा एकत्र करा आणि तुमच्या श्वासातील अस्थिरता संपवा. समर्पण आणि साधनेच्या साहाय्याने हे शक्य आहे, पण आपल्या आयुष्याचे काय होत आहे, हे बहुतांशी लोकांच्या खूप उशिरा ध्यानात येते. जेव्हा मोहमायेच्या सागराच्या लाटांमध्ये कुणी बुडत असतो, तेव्हा समर्पणाचे लाइफ जॅकेट अंगावर चढवून तो बचाव करणाऱ्या लोकांचा धावा करू शकतो. मोहाच्या भावनांचा प्रतिकार न करता आपल्या अस्थिर श्वासाचे निरीक्षण करा आणि अंतःकरणातील शांत जागी विराजमान व्हा.

सर्वांत प्रथम तुमच्या मोहमायेच्या भावनांना या दिव्य ज्ञानाकडे आणि ईश्वरचरणी घेऊन जा. सामान्य आणि क्षुद्र गोष्टींचा तुम्हाला मोह होत नाही, हे तुमचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला ईश्वराचा जो मोह होतो, ते तुमचे सौंदर्य आहे.

- चेतना तरंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com