
चेतना तरंग : कंटाळा आणि साधना
कंटाळा म्हणजे नेमके काय? आवड किंवा प्रेम नसतानाही एखादी कृती पुनःपुन्हा केल्याने येतो तो कंटाळा. असे केल्याने मन एका एकमार्गी ध्यास-स्थितीत जाते आणि त्यामुळे आत्म्याला झाकोळून टाकते. तसे पाहता साधना नियमित करणे हीसुद्धा पुनःपुन्हा केलेली कृतीच असते, पण तिचा हेतू मात्र कंटाळा दूर करून आपल्याला पुन्हा आत्म्याशी एकरूप करण्याचा असतो. साधना करू लागल्यावर सुरवातीला कंटाळा येतो खरा, पण तरीही साधना चालू ठेवली की ती पुढे त्याच कंटाळ्याला छेदून जाते आणि त्यास कायमचे नष्ट करते. साधनेमुळे आनंद मिळो वा कंटाळा येवो, ती चालू ठेवली पाहिजे. कारण मनावर ताबा मिळवण्यासाठी साधना हा एकमेव उपाय आहे.
आत्मा म्हणजे प्रेम होय आणि प्रेमामध्ये पुनरावृत्ती आहेच. प्रेमपत्रांमध्ये तर त्याच त्या विषयी कित्ती पुनरावृत्ती असते. पण तरीदेखील त्यामध्ये कंटाळा असत नाही. खोल-गहन आणि नियमित ध्यानसाधनेच्या साहाय्याने तुमच्यातील कंटाळा समूळ नष्ट करा. जागे व्हा आणि प्रगतिपथावर चालत राहा.
भेटवस्तू आच्छादनाचा कागद
भेटवस्तू आच्छादण्यासाठी जो रंगीत कागद असतो, तशीच आपल्या संवेदनांना सुखावणारी सुखे असतात. पण खरा आनंद या आच्छादनांच्या आत असतो, जसा आत्म्यात. ईश्वराचे प्रेम हीच सगळ्यात महत्त्वाची भेटवस्तू आहे. तरीदेखील या भेटवस्तूला गुंडाळणाऱ्या रंगीत कागदाला आपण धरून बसतो आणि भेटवस्तूचाच आपण आनंद लुटला आहे असे समजतो! चॉकलेटवरील चकचकीत कागदासह ते तोंडात ठेवण्यासारखंच आहे हे. तो कागद धातूचा असल्याने त्याने तोंडात जखमाही होणार, जरी थोडे चॉकलेटही त्याबरोबर तोंडात उतरले तरी! भेटीवरचा आच्छादनाचा कागद काढून ठेवा. आतील वस्तू म्हणजेच ही तुमच्या भोवतालची सर्व सृष्टी तुमच्या आनंद-भोगासाठी आहे. शहाण्या माणसाला ती आतली भेट कशी भोगायची माहीत असते आणि अडाणी माणूस तो रंगीत कागद धरून बसतो.
Web Title: Boredom And Practice Writes Shri Shri Ravishankar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..