नांदेडला हरभरा उत्पादकांचे ४० कोटींचे चुकारे थकले...

file photo
file photo

नांदेड - जिल्ह्यात ‘नाफेड’कडून केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार तूर व हरभरा धान्य खरेदी करण्यात आले. यात आठ हजार सहाशे शेतकऱ्यांची ४३ हजार ३४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली तर पंधरा हजार १२५ शेतकऱ्यांचा दोन लाख ६२ हजार २७३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा खरेदीतील दहा हजार ४९१ शेतकऱ्यांचे एक लाख ७८ हजार २९५ क्विंटल हरभऱ्याचे ८६ कोटी ९१ लाख ९२ हजार रुपये देण्यात आले. परंतु अद्याप चार हजार ६३४ शेतकऱ्यांचे ८३ हजार ९७८ क्विंटल हरभऱ्याचे ४० कोटी ९३ लाख ७२ हजार रुपये थकले आहेत.

जिल्ह्यात १६ खरेदी केंद्रावर किमान हमी दरानुसार हरभरा व तूर खरेदी करण्यात आला. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नांदेड, मुखेड, किनवट, हदगाव, बिलोली व देगलूर तर विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनकडून नायगाव, भोकर व धर्माबाद येथून तसेच महाराष्ट्र फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडून (महाएफपीसी) धानोरा, (ता. धर्माबाद), करडखेड (ता. देगलूर), बरबडा (ता. नायगाव, डोणगाव (ता. बिलोली), नारनाळी (ता. कंधार), मांडवा (ता. किनवट) व धानोरा मक्ता (ता. लोहा) या ठिकाणी खरेदी करण्यात आली. 

हरभरासोबत तूरीचेही पैसे थकले
संपूर्ण हंगामात १५ हजार १२५ शेतकऱ्यांचा दोन लाख ६२ हजार २७३ क्विंटल हरभरा चार हजार ८७५ हमी दराने खरेदी करण्यात आला. आजपर्यंत दहा हजार ४९१ शेतकऱ्यांच्या एक लाख ७८ हजार २९५ क्विंटल हरभऱ्याचे ८६ कोटी ९१ लाख ९२ हजार रुपये देण्यात आले. परंतु अद्याप चार हजार ६३४ शेतकऱ्यांच्या ८३ हजार ९७८ क्विंटल हरभऱ्याचे ४० कोटी ९३ लाख ७२ हजार रुपये थकले आहेत. या सोबतच जिल्ह्यातील पंधरा ठिकाणच्या केंद्रावर आठ हजार सहाशे शेतकऱ्यांची ४३ हजार ३४२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या पैकी आठ हजार तीनशे ३७४ शेतकऱ्यांच्या ४२ हजार ६३९ क्विंटल तुरीचे पाच हजार आठशे रुपये दराने २४ कोटी ७३ लाख ६५ हजार ८८२ रुपये देण्यात आले. यापैकी ६९३ क्विंटलचे चाळीस लाख १९ रुपये देणे शिल्लक असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

शेतकऱ्यांकडे द्यावे लक्ष
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे पेरण्याही वेळेवर झाला. मात्र, या दोन महिन्यात पुन्हा पाऊस झाल्याने हाताला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा वाढल्या आहेत. आता तूर, हरभरा धान्य खरेदी करुनही अद्याप साडेचार हजाराच्यावर शेतकऱ्यांना त्याचे चुकारे मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणींकडे लक्ष देऊन त्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com