NND16KJP02.jpg
NND16KJP02.jpg

कृषी निविष्ठा बाजारात शुकशुकाट

नांदेड : आगामी खरीप हंगाम जवळ येवूनही जिल्ह्यातील कृषी निनिष्ठा विक्री बाजारात मात्र शुकशुकाट दिसत आहे. कोरोना संकटात कर्जमाफी अडकल्याने पिककर्ज वाटप रखडले आहे. यामुळे पैशाअभावी शेतकरी बियाणे, खतासाठी बाजारात येण्यासाठी धजावत नाहीत. काही शेतकरी मात्र दर कमी असलेला युरीया खरेदीला प्राधान्य देत आहेत.
 
आठ लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज
जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात सात लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करुन त्याबाबत पेरणीचे नियोजन केले आहे. यासाठी खते, बियाणांची उपलब्धता व्हावी, यासाठी प्रशासनाच्या सहायाने नियोजन सुरु आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन चार लाख हेक्टरवर तर कपाशी दोन लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यासाठी खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्राकडून सोयाबीन व कपाशीचे बियाणे उपलब्ध होणार आहे. कपाशीचे साडेचौदा लाच पॉकिट मिळणार आहेत. बियाणे महामंडळाकडून २८ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार आहे. 

दोन लाख १४ हजार खातेदारांना कर्जमाफीची प्रतिक्षा
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहेत. तर एक लाख ९५ हजार ८२५ खाते पोर्टलवर डाटा अपलोडचे काम झाले आहे. पात्र खातेदारांना कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी ३६ लाख रुपये लागतील, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील सोनखेड व कामठा बुद्रुक येथील ३६४ खात्यांवर कर्जमाफीचे दोन कोटी ४७ लाख रुपये जमा झाले. तसेच 
एक लाख ९५ हजार ८९२ पात्र खाते कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड केले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी होण्याच्या भितीने सदरील पोर्टल बंद केले आहे. यामुळे कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे. कर्जमाफी नसल्याने पिक कर्ज वाटपाचे कामही रखडल्याने शेतकरी पेरणीच्या हंगामात अडचणीत आले आहेत.

पिककर्ज वाटपही रखडले
आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी दोन हजार ३१ कोटी, तर रब्बीसाठी ५०७ कोटी, असे एकूण दोन हजार ५३९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. परंतु, यंदा शेतकऱ्यांची पीककर्ज माफी कोरोना विषाणूच्या उपाययोजनेत लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये अडकल्याने पीककर्ज वाटपाचे काम ठप्प आहे. केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून जिल्ह्यातील ४७५ शेतकऱ्यांना दोन कोटी २२ लाख, तर महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ३३ शेतकऱ्यांना ३४ लाखांचे कर्ज वाटल केले आहे. या दोन बॅंकेच्या शाखांकडून आजपर्यंत १.३२ टक्क्यानुसार ५०८ सभासदांना दोन कोटी ५६ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. परंतु, जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या शाखांनी आजपर्यंत कर्जवाटपाचे खातेही उघडले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पैशाअभावी बाजारात शुकशुकाट
दरवर्षी शेतकरी एप्रील व मे महिन्यात पेरणीच्या तयारीचे नियोजन करतात. खते तसेच बियाणे वेळेवर खरेदी केले तर योग्य दरात मिळते, असा अनेक वर्षाचा अनुभव शेतकऱ्यांना असतो. यामुळे ते मे महिन्यात बियाणे तसेच खतांची खरेदी करतात. परंतु यंदा खरीप हंगाम जवळ येवूनही जिल्ह्यातील कृषी निनिष्ठा विक्री बाजारात मात्र शुकशुकाट दिसत आहे. पैशाअभावी शेतकरी बियाणे, खतासाठी बाजारात येण्यासाठी धजावत नाहीत. काही शेतकरी मात्र दर कमी असलेला युरीया खरेदीला प्राधान्य देत आहेत. इतर संयुक्त तसेच मिश्र खतांचा मागणी नसल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणने आहे. 

एप्रीलमध्ये दहा हजार टन युरीयाचा पुरवठा
आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्याला मंजूर आवंटनापैकी एप्रीलमध्ये दहा हजार ३९६ मेट्रीक टन युरीचा पुरवठा झाला आहे. यामुळे सध्या बाजारात मुबलक प्रमाणात युरीया असल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली. शेतकरीही सध्या कमी पैशात उपलब्ध होत असल्याने संयुक्त तसेच मिश्र खताएवजी युरीया खरेदीसाठी पुढे येत आहेत. आगामी काळातही खतांची कमतरता पडणार नाही, यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहिम अधिकारी श्री हंडेकर यांनी सांगीतले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com