हरभऱ्याचा ढीग जळून खाक; दोन लाखाची नुकसान, अज्ञातांविरुद्ध अर्धापूरमध्ये गुन्हा दाखल

file photo
file photo

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील शेणी येथील शेतकऱ्याचे साडेचार एकरमधील काढलेला हरभऱ्याचा ढीग अज्ञाताने मंगळवारी (ता. दोन) रात्री आठ वाजताच्या सुमारास पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान परिसरात अशा वारंवार घटना घडत गेल्या असून ही महिन्यातील सहावी घटना आहे. 

निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे नुकसान झाले. संघर्ष हा शेतकऱ्यांच्या सतत नशिबी असतो.  शेतकरी खचून न जाता पिकांची लागवड करतच असतो. खरिपामध्ये नुकसान होऊनही शेणी येथील सुभाषराव खांडरे यांनीही साडेचार एकरात हरभऱ्याची पेरणी केली. मागील दोन दिवसापासून हरभरा जमा करणे सुरु होते. संपूर्ण हरभरा जमा केले होते. आणि येत्या दोन दिवसात मळणी यंत्राद्वारे हरभऱ्याची काढणी करण्यात येणार होते. मात्र मंगळवारीच्या रात्रीला अज्ञात व्यक्तीने हरभऱ्याच्या ढिगाला आग लावल्यामुळे दोन लाखाचे नुकसान झाले. 

साडेचार एकरात हरभऱ्याची पेरणी केली होती. मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने लगबगीने दोन दिवसांपूर्वी हरभऱ्याचे ढीग जमा केले. मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजताच्या सुमारास घराकडे आले. लागलीच आठ वाजताच्या सुमारास सालगड्याने फोन करून घटनेची माहिती दिली. शेतकरी शेतात येईपर्यंत संपूर्ण ढीग जळून खाक झाले होते. अंदाजे दोन लाख रुपयांवर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याजळीतप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अर्धापुर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पोलिस व महसूल विभागाला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी येऊन कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. तलाठी छाया बनसोडे आणि पोलिस ठाण्याचे बीट हवालदारदार श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.

हरभरा पेरणीपासून ते जमा करण्यापर्यंत हजारो रुपयांचा खर्च वाया गेला. तसेच हरभऱ्यापासून मिळणारा नफा तोही जळून खाक झाला आहे. बी- बियाणे, तीन फवारण्या, खुरपणी, हरभरा जमा करण्यासाठी पाच हजाराच्या चटई, दहा हजाराच्या ताडपत्रीसह साडेचार एकर क्षेत्रातील हरभऱ्याचे ढिगाचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला आलेला घास नेहमीच निसर्ग हिरावून घेतो. हे नेहमीचेच झाले असताना अस्मानी संकटासह व्यक्तिगत विकृत सुलतानी संकटालाही शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काही विकृत समाजकंटक शेतकऱ्यांच्या पिकांचे सातत्याने नुकसान करत आहेत. सुरेश धात्रक यांची उभी केळीचे झाड कापणे, शेतकरी पन्नासे यांचे टरबूज नुकसान करणे, त्रिमुख पावडे यांचे काढणीस आलेले केळीचे घड कापणे, जितेंद्र देशमुख यांचे ढीग करुन ठेवलेले सोयाबीन पेटवून देणे, अविनाशराव देशमुख यांचा आखाडा जाळून टाकणे आदी घटना यापूर्वी घडल्या आहेत. सदरील शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ही सहावी घटना असून ते विकृत समाजकंटक कोण ? हे शोधणे पोलिसांसमोर एक आव्हान राहणार आहे. दरम्यान सदरील आरोपींना शोधून पोलिसांनी कठोर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com