मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा निर्णय लवकर घ्यावा...

खासदार प्रताप पाटील चिखलीकर
खासदार प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड - यंदा कोरोना आणि लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पंढरपूरला पालख्यांसोबत जाणाऱ्या राज्यातील लाखो वारकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्याचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी मागणी नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
 
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त जाणारा पालखी सोहळा वारकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याविषयी त्वरीत निर्णय घेऊन वारकऱ्यांचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे.

वारकऱ्यांचे आराध्य दैवत
खासदार चिखलीकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदीर महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेली आषाढी यात्रा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या परमश्रध्देचा विषय आहे. त्यातल्या त्यात संत श्री ज्ञानेश्वर माऊली व संत श्री तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो दिंड्या व लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. 

वारकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करा
यंदा कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी हे पालखी सोहळे पूर्वीप्रमाणे निघणार का? त्या विषयी वारकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच या सोहळ्याविषयी वेगवेगळी मते नोंदविली आहेत. त्यामुळे या सोहळयाची परंपरा वारकऱ्यांची श्रध्दा पालखी सोहळे व वारकरी दिंड्याच्या माध्यमातून होणारी अफाट गर्दी लक्षात घेता आपण स्वतः पालखी सोहळ्याविषयी त्वरित निर्णय घेऊन तमाम वारकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा, अशी विनंती खासदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अनेक पालख्यांचे होते प्रस्थान
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पालख्या, दिंड्या निघतात. आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची तर देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. शेगावच्या गजानन महाराज यांची पालखी शेगावहून पंढरपूरला येते. त्याचबरोबर राज्यभरातूनही अनेक ठिकाणाहून पालख्या, दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यंदा मात्र, कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे लाखो वारकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे याबाबत त्वरीत निर्णय घेऊन हा संभ्रम दूर करावा, अशी विनंती खासदार चिखलीकर यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com