कोरोना इफेक्ट : जिल्ह्यातील एवढ्या ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवकांकडे

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात व सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्वच निवडणूका घेण्यात येणार नाहीत असा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिल्यानंतर जिल्हाअंतर्गत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतचा काराभार आता शासकिय यंत्रणेकडे गेला आहे. जिल्ह्यातीलल सव्वाशे ग्रामपंचायतीचा काराभार आता ग्रामसेवकांमार्फत चालणार आहे. त्यांनी आपले काम सांभाळून हे अतिरिक्त काम करावे लागणार आहे. नुकतेच जिल्हा परिषेदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश काढले आहेत. 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याच निवडणुका होऊ शकत नसल्याने ऑगस्ट २०२० पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासनाकडे देण्यात आला असून हे सर्व प्रशासन विस्ताराधिकारी संवर्गातील आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या कोणत्याच निवडणुका घेता येत नाहीत. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या आहेत. अशा ग्रामपंचायतीवर संबंधित गावातील योग्य व्यक्तीची निवड करावी यासाठी पालकमंत्री यांची मदत घ्यावी असे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले होते. हा विषय न्यायालयापर्यंत गेला न्यायालयानेही या निर्णयावर राज्य सरकारला खडसावले होते.

जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती 

महाराष्ट्र पंचायत सुधारणा अध्यादेशानुसार नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध किंवा व्यक्ती आणि प्रशासकीय अडचणी किंवा महामारी यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार पंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य झाले नसले तर राज्य शासन पंचायतीच्या प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. त्यामुळेच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेला असल्याने या आदेशानुसार जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही

या ग्रामसेवकांनी संबंधित ग्रामपंचायतीचा पदभार स्विकारून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियममधील तरतुदी व वेळोवेळी दिले जाणाऱ्या शासन आदेशानुसार कामकाज सुरू करावे असे आदेश दिले आहेत. मात्र या प्रशासकांना ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही. तसेच त्यांनी मूळ पदाचे कामकाज सांभाळून प्रशासक पदाचे काम पाहावे असे निर्देश या प्रशासकांना देण्यात आले आहेत.

प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक करणार ध्वजारोहण

मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीत ता. १५ ऑगस्ट रोजी प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक गावांचा कार्यभार असलेल्या प्रशासकांच्या बाबतीत त्यांनी एका गावात ध्वजारोहण करायचे आहे. तर इतर गावात स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा गट विकास अधिकारी यांनी नेमलेल्या सक्षम अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वी. आर. कोंडेकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com