नांदेड जिल्ह्यात वाढली गुन्हेगारी, सोमवारी रात्री पुन्हा एका युवकाचा खून  

File photo
File photo

नांदेड : शहरात दिवसेंदिवस खंडणी, टोळी युद्धातून जीवघेणे हल्ले व जिवे मारण्यापर्यंत मजल गेली आहे. आठवडाभरामध्ये नांदेड शहरामध्ये तीघांचा खून झाला असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तर पोलिसांना भाईगिरीच्या मुस्क्या आवळण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.  

लॉकडाउनच्या काळामध्ये गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, गेल्या आठवड्याभरापासून शहर व परिसरामध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरुच आहेत. सोमवारी (ता.१०) रात्री आठच्या सुमारास सांगवी (अंबानगर) परिसरात असलेल्या गौतमनगर येथे तिघा जणांनी पूर्ववैमन्यातून अनिल कांबळे या युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आठ दिवसात तिसरा खून
गेल्या आठ दिवसातील शहर व परिसरातील खुनाची ही तिसरी घटना आहे. टोळी युद्धातून विक्की चव्हाणचा खून करण्यात आला, त्यानंतर खडकपुरा येथे युवकाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच लोहा येथील एका मुलाचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. यात त्या गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्या पाठोपाठ सोमवारी रात्री सांगवी भागात युवकाचा खून झाला. खुनाच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, विमानतळ पोलिसांनी गौतमनगर येथील खून प्रकरणात तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. खुनाच्या घटनेनंतर या परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. एकूणच गुन्हेगारांचा मुक्त संचार आणि गुन्ह्यांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हाणामारी तसेच खुनाच्या घटनांमध्ये शस्त्रांचा आणि गावठी पिस्तुलांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. यामुळे गावठी पिस्तुक व शस्त्रे गुन्हेगारांना सहजपणे उपलब्ध होत असल्याचे अलिकडच्या वाढत्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचलेच पाहिजे - देशभरातील १५ संशोधकांच्या यादीत नांदेडच्या शिवराज नाईकची निवड; या आजारावर केले महत्वपूर्ण संशोधन
   
पोलिसांसमोर भाईगिरी थांबविण्याचे आव्हान
आतापर्यंत अनेकवेळा स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित पोलिस ठाण्याच्या पथकाकडून गावठी कट्टे तसेच रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले. परंतु ते कुठून आले? कोणी विकले याचा शोध लागलेला नाही. हे गावठी कट्टे विकणारा म्होरक्या कोण? याचाही शोध पोलिस लावू शकले नाहीत. शहरात यापुर्वीही गावठी कट्ट्याचा धाक धाकवून लुटण्याचे प्रकार घडले आहेत. शहर व परिसरात अशा अनेक टोळ्या सक्रीय झाल्या असून, पोलिसांसमोर भाईगिरीला थांबविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

गावठी कट्ट्याची खरेदी-विक्री वाढली
शहरात दिवसेंदिवस खंडणी, टोळी युद्धातून जीवघेणे हल्ले व जिवे मारण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. त्यामुळे शहरामध्ये सर्रास रिव्हॉल्व्हर व गावठी कट्ट्यांचा उपयोग गुन्हेकारांकडून केला जात असून या शस्त्रांची खरेदी-विक्री कुठे होत आहे, त्याचा पोलिसांनी शोध घेणे भाईगिरी संपुष्टात आणावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com