देगलूर एसटी आगाराचे साडेसहा कोटींचे नुकसान

कर्मचारी संपाचा परिणाम : वीस हजार कमावणाऱ्या गाड्या आल्या तीन हजारावर
st
stsakal

देगलूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीन करून घेऊन सातवा वेतन आयोग लागू करावा आणि अन्य मागण्यासाठी गेल्या ता.३१ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी दुखवटा नावाने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या संपामुळे देगलूर आगाराचे साडेसहा कोटीचे नुकसान झाले आहे.

देगलूर आगारातील गाड्या दररोज वीस हजार किमी धावायच्या आता त्या दोन ते तीन हजार धावताहेत. त्यातून देगलूर आगाराला दररोज साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न होत होते आता ते अत्यल्प झाले आहे. आगारातील २५ वाहक, चालक बडतर्फ आहेत. सध्या बारावीच्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व पदवीच्या सत्र परीक्षा सुरू झाल्या आहेत. बस सेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे, याकडे सरकारने त्वरित लक्ष देऊन काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीन करून घेऊन सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, वेतनवाढ देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या ता.२७ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील परिवहन महामंडळाच्या ९५ हजारावर अधिक कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

ता.३१ ऑक्टोबरपासून देगलूर आगारातील ३११ कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान वरिष्ठांच्या तसेच स्थानिक आगार प्रमुखांच्या आदेशानुसार देगलूर आगारातील २५ कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबनानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याचे आगार प्रमुख अशोक चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

(ता.आठ) फेब्रुवारी पासून इयत्ता बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू झाली आहे. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कला वाणिज्य व विज्ञान पदवी वर्गाच्या सत्र परीक्षांना देखील सुरुवात झाली आहे. विद्यापीठ आणि बोर्डाकडून ह्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर यावे लागत आहे.

खासगी वाहनातून जीव धोक्यात घालून प्रवास

गावापासून शाळा, महाविद्यालये असलेल्या गावा, शहरापर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वात सोयीस्कर परिवहन महामंडळाची बसगाडी असे; परंतु गेल्या शंभरावर दिवसापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना प्रवासासाठी बसची सेवा मिळणे अवघड होऊन बसले आहे. विद्यार्थी नाईलाजाने छोट्या-मोठ्या खासगी वाहनातून जीव धोक्यात घालून परीक्षा केंद्रावर जात आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना खासगी वाहन मिळेल किंवा परवडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सरकारने तात्काळ सुरळीत बससेवा सुरू करावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com