गोदावरी दुथडी भरून वहात असून गोवर्धन घाटची स्मशानभूमी तसेच नावघाटचा पुल पाण्याखाली गेला आहे
नांदेड: जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असल्यामुळे डाॅ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडले असून त्यातून एक लाख क्युसेक्सच्या जवळपास पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये सोडला जात आहे. परिणामी गोदावरी दुथडी भरून वहात असून गोवर्धन घाटची स्मशानभूमी तसेच नावघाटचा पुल पाण्याखाली गेला आहे.
पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने विष्णुपुरी प्रकल्पामध्ये पाण्याचा येवा वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचेही दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी पाणीपातळीत वाढ झाल्याने विष्णुपुरीचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे.
जिवरक्षक दल तैनात
विष्णुपुरी प्रकल्पाच्या दहा दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीपात्रात कोणीही जावू नये, असा धोक्याचा इशारा नावघाट, मरघाट परिसरातील नागरिकांना देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून जीवरक्षक दलाला तैनात करण्यात आले आहे.
जिल्ह्यात संततधार
नांदेडसह जिल्ह्यामध्ये सोमवारी सायंकाळपासून पावसाची संतताधर सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वहात आहे. मुखेड येथे एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यातील दोघांपैकी एकाने झाडाचा सहारा घेतला तर एकजण वाहून गेला आहे. तसेच नरसीफाटा येथील बालाजीमंदिरालाही पाण्याने वेढले आहे. नदी-नाल्यांचे पाणी गावांमध्ये घुसल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.