आपके पास मै पाणीपुरी खाने को आऊंगा...

नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन
नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन

नांदेड - आप कहॉ जा रहे हो...अब जल्दीही लॉकडाउन कम हो जायेगा...आप यहा रहो और अपना पाणीपुरी का ठेला सुरु करो... मैं खुद पाणीपुरी खाने को आऊंगा...अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कामगारांशी चर्चा करुन त्यांच्याप्रती आपुलकी आणि सहानुभुती व्यक्त केली. 

नांदेडच्या रेल्वेस्थानकावरुन उत्तर प्रदेशला गोरखपूरकडे जवळपास दीड हजार कामगार, मजूरांना घेऊन श्रमिक रेल्वे बुधवारी (ता. १३) रवाना झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी उपस्थित मजूर, कामगारांशी संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली. त्यामुळे त्यांना देखील आनंद झाला.

जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
राज्य शासनाच्या निर्देशानुसार उत्तरप्रदेश येथील मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी नांदेड येथून रेल्वे सोडण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण तयारी केली होती. या प्रयत्नामुळे मजुरांना घरी जाण्याचा दिलासा मिळाला आहे. मजुरांच्या रेल्वे तिकिटाचा खर्च प्रशासनाने केला आहे. जिल्‍हा प्रशासन व स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍यावतीने प्रवासापूर्वी मजुरांची थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, प्रवासात जेवण, नाश्ता, पाणी बॉटल तसेच आवश्यक सुविधा सोबत देऊन सामाजिक अंतर राखून मजुरांना रेल्वे बोगीपर्यंत सोडण्यात आले होते. यावेळी साईप्रसाद परिवार, ओमप्रकाश पोकर्णा मित्रमंडळ, जवान प्रविण देवडे यांच्यासह अनेकांनी मजूरांना मदत केली. 

जिल्हाधिकारी यांनी साधला संवाद
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी यावेळी मजूर, कामगारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत चर्चा केल्याने मजूर, कामगारही आनंदी झाले. संकटाच्या काळातही आमच्याकडे काही काम नसताना प्रशासनाने आमच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली त्यामुळे नांदेडकरांचे प्रेम कधीही विसरु शकणार नाही, अशा शब्दात कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी एका पाणीपुरीवाल्या कामगाराशी संवाद साधला. तुझ्या पाणीपुरीच्या ठेल्यावर मी पाणीपुरी खायला येतो, असे म्हटल्यावर त्याने देखील नक्की या पण मी गावाला जाऊन आल्यानंतर. आता घरच्यांची आठवण येते मी गावाला जाऊन येतो. असे उत्तर त्याने दिले. 

‘भारत माता की जय’
परप्रांतातून आलेल्या मजूर, कामगारांना नांदेडकरांनी भरभरुन प्रेम दिल्यामुळे ते देखील भारावून गेले होते. लॉकडाउनच्या काळात आम्हाला खूप मदत केली. काही जणांनी आम्ही पुन्हा येणार असल्याचे सांगितले तर काही जणांनी आता कोरोनाची परिस्थिती पाहून आम्ही ठरवू असे सांगितले तर काही जणांनी आता लवकर येणे शक्य नसल्याचे सांगितले. या ठिकाणी विटभट्टी, शेत, हॉटेल, रस्त्याच्या कामावर आदी ठिकाणी हे मजूर, कामगार कामाला होते. रेल्वे निघाल्यानंतर मजूर, कामगारांनी आनंदाने ‘भारत माता की जय’ असा घोषणा दिल्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com