Nanded News : सुरक्षा कठड्यांची उंची वाढवा ; पुलावरून उडी मारण्याच्या घटना चिंताजनक, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
नांदेड : शहरातील गोदावरी, आसना नदीवरील वेगवेगळ्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे. त्यामुळे या आत्महत्या थांबविण्यासाठी पुलांच्या सुरक्षा कठड्यांची उंची वाढविण्याची किंवा जाळी उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. त्याचबरोबर याबाबत शहर विकास समितीने देखील एक निवेदन देऊन मागणी केली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने देखील समन्वय ठेऊन याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नांदेड शहरातून गोदावरी नदी वाहते. त्यामुळे या नदीवर हैदराबाद बायपास, देगलूर नाका, जुना मोंढा नवीन पुल तसेच गोवर्धन घाट पूल तसेच नसरतपूर जवळील पूल असे जवळपास सहा वेगवेगळे पूल आहेत. तसेच आसना नदीवरही सांगवी भागात पुल आहे. मात्र, यातील बऱ्याच पुलाच्या बाजूला असलेले संरक्षण कठडे हे छोटे आहेत. त्यामुळे काही वेळेला वेगवेगळ्या कारणामुळे नैराश्यातून आलेल्या व्यक्ती या पुलाचा वापर आत्महत्येसाठी करताना दिसून येत आहेत. या पुलांवरून उडी मारून आत्महत्या करत असल्याच्या घटना या काळात वाढल्या आहेत. काही जणांना जीवरक्षकांनी व नागरिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला तर काही जण मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत शहर विकास समितीतर्फे उमाकांत जोशी, वसंत सुवर्णकार आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन सादर केले आहे.
शहरातील गोवर्धन घाटचा पूल हा मध्यभागी व शहरातून बाहेर गावी जाणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्वाचा आणि वर्दळीचा पूल आहे. परंतु हा पूल बांधताना कठड्याची उंची प्रमाणात नसून कमी आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कठड्याची रचना पायऱ्यासारखी केली आहे. अगदी लहान मुलगा सुद्धा यावर सहज चढू शकतो. गेल्या काही दिवसात या पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पुलांवरील कठड्यांची उंची वाढविणे किंवा सुरक्षा जाळ्या बसविणे आवश्यक आहे.
- उमाकांत जोशी, शहर विकास समिती..
‘सकाळ’च्या वाचकांनी सुचवले हे उपाय
यापूर्वी देखील आत्महत्या होत असल्यामुळे संरक्षण भिंत किंवा जाळी उभी करावी, अशी मागणी शास्त्रज्ञ दिनकर बोर्डे यांनी केली होती. मात्र, त्यावेळी देखील प्रशासनाने ही बाब गांभीर्यांने घेतली नव्हती. दरम्यान, ‘सकाळ’च्या वाचकांना विचारले असता त्यांनी याबाबत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामध्ये संरक्षण भिंत किंवा जाळी उभारण्याबरोबरच पुलाच्या दोन्ही बाजूला चांगली निसर्ग व इतर चित्रे काढावीत त्याचबरोबर फलक लाऊन त्यावर प्रबोधनात्मक, सकारात्मक सुविचार लिहावेत. जेणेकरून आत्महत्या करणाऱ्याचे मत परिवर्तित होईल आणि तो आत्महत्या करण्यापासून परावृत्त होईल. तसेच या पुलावर पोलिस किंवा स्वयंसेवी संस्थाच्या सदस्यांना नियुक्त करण्यात यावे. पोलीस चौकी किंवा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याद्वारे नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही उपाय सुचविण्यात आले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.