जागतिक ऑलंम्पिक स्पर्धेतील भारताचे असे आहे यश-अपयश, जाणून घ्या... 

File Photo
File Photo

नांदेड : २३ जून २०१९ रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धा अमेरिका, युरोप, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या खंडातून दर चार वर्षांनी पार पडतात. त्यास जागतिक ऑलंम्पिक स्पर्धा म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय ऑलंम्पिक समितीच्या वतीने १८९६ पासून या स्पर्धेस प्रारंभ झाला. या समितीची स्थापना २३ जून १९८४ पासून क्रिडा जगतात झाली. नियमितपणे ‘जागतिक ऑलंम्पिक दिन’ म्हणून सुरुवात करण्यात आली. या दिनानिमित्त जागतिक ऑलंम्पिक स्पर्धेतील भारताचे यशापयश या विषयावर प्रा. डॉ. प्रमोद वाघमारे यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.


तर...असा आहे हा जागतिक ऑलंम्पिकचा प्रवास..

इ.स.पूर्व ७७६ पासून ग्रीसमधील ऑलिम्पिया या ठिकाणी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यावरून या खेळाचे नाव ऑलंम्पिक असे पडले आहे. कालांतराने ग्रीसच्या ऱ्हासाबरोबर इ.स.पूर्व ३९४ मध्ये ऑलंम्पिक स्पर्धा बंद पडल्या. पंधराशे वर्षापासून बंद पडलेल्या स्पर्धेस सुरु करण्याचे काम फ्रेंच क्रिडापटु ‘बॅरन क्युबर्टीन’ यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली २३ जून १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलंम्पिक समितीची स्थापना करण्यात आली व या समितीमार्फत ता. सहा ते १५ एप्रिल १९८६ पासून ग्रीसमधील अथेन्स शहरातून ऑलंम्पिक स्पर्धा भरविण्यात सुरुवात झाली. सुरुवातीस १४ देशातील २४१ खेळाडूंच्या सहभागाने पन्नास हजार क्रिडाप्रेमींच्या उपस्थितीत ही स्पर्धा झाली. आज स्पर्धेत २०० पेक्षा अधिक देश व पाच ते सहा हजार स्पर्धक सहभागी होतात.

आजपर्यंत भारताला ऑलंम्पिक स्पर्धेत आठ क्रीडा प्रकारातून एकूण २८ पदके

सन १९०१ मध्ये येथे पॉरिस येथे पार पडलेल्या दुसऱ्या ऑलंम्पिक स्पर्धेतून भारताने या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत ब्रिटिश राजवटीतील भारताकडून ‘नार्मन प्रितचार्ड’ या एकमेव खेळाडुच्या माध्यमातून झाला. त्याने ॲथेलेटिक्स क्रिडाप्रकारातून भारताला दोन रौप्यपदक प्राप्त करून दिले. त्यानंतर आजपर्यंत भारताला ऑलंम्पिक स्पर्धेत भारताला नऊ सुवर्ण, सात रौप्यपदक व १२ कास्यपदक अशी एकूण २८ पदके या आठ क्रीडा प्रकारातून मिळवून दिली. भारताला हॉकी सांघिक खेळाने आठ सुवर्ण, एक रौप्य व दोन कास्यपदके मिळवून दिली. तर टेनिस, ॲथेलेटिक्स, वेटलिफ्टिंग, शूटिंग, बॉक्सिंग, रेसलिंग, बॅडमिंटन या प्रकारातून खाशाबा जाधव, कर्णममल्लेश्वरी राठोड, अभिनव बिंद्रा, सुशील कुमार, विजेंदर सिंग, विजय कुमार, साइना नेहवाल, मेरी कोम, योगेश्वरी दत्त, पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक यासह अनेक भारतीय क्रीडापटूंनी भारताला पदके प्राप्त करून दिली. २०१२ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या या ऑलंम्पिक स्पर्धेत एकूण सहा पदके प्राप्त झाल्यामुळे ही भारतातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

खेळाच्या उत्तरत्या आलेखांची घसरण थांबवा

ऑलंम्पिक क्रीडा क्षेत्रातील भारतीय खेळाडूंनी प्राप्त केलेले यश हा भारताचा गौरवच आहे. मात्र, अन्य देशांच्या तुलनेत ऑलंम्पिक स्पर्धेत भारताला म्हणावे तसे यश प्राप्त करता आले नाही. हे आजवरच्या खेळाच्या इतिहासावरुन दिसून येते. बऱ्याच वेळा एखाद्या कास्यपदकावर समाधान मानावे लागते तर १९२०, १९२४, १९७६, १९८४, १९८८ व १९९२ च्या ऑलंम्पिक स्पर्धेत भारताला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. २०१६ मध्ये ब्राझील येथे पार पडलेल्या ३१ व्या रिओ ऑलंम्पिक स्पर्धेत ११७ खेळाडूंच्या टीममधून भारताला रौप्य व कास्यपदकावर असे मिळुन  दोन पदक पटकावता आले. याच स्पर्धेत अमेरिका १२१, इंग्लंड ९७, चीन ७०, रशिया ५६ अशी पदके मिळविण्यात यशस्वी ठरले. इ. स. १९०० च्या सुरुवातीस १७ व्या स्थानी असलेल्या भारताचे २०१६ मध्ये ६७ व्या स्थानावर गेले आहे. या उत्तरत्या आलेखांची घसरण थांबवून त्यात वाढ करण्याची नितांत गरज आहे.

 मानसिकता बदला

शासनाकडून दरवर्षी क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटना व संस्था यांना खेळास प्रोत्साहन मिळावे म्हणून शिष्यवृती, अनुदान व वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. शिवाय शासकीय सेवेत नोकरीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. मात्र, याबाबत बहुतांशी खेळाडूंचे पालक, शिक्षक व शिक्षण संस्था उदासीन असल्यामुळे खेळाविषयीच्या त्यांच्यातील असलेल्या मानसिकतेमध्ये बदल झाल्याशिवाय विकास होणे शक्य नाही, असे मत प्रा. डॉ. प्रमोद वाघमारे यांनी व्यक्त केले.

राजकीय हस्तक्षेपामुळे ऑलंम्पिक स्पर्धेत अडथळे

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्यास उपयुक्त अशा भौतिक सुविधा भारतातील मोजक्याच शहरात उपलब्ध आहेत. ग्रामीण भाग तर दूरची गोष्ट असून ऑलंम्पिकमध्ये खेळाची अद्यावत माहिती, तज्ज्ञ प्रशिक्षकांचा अभाव व या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन व क्रीडा क्षेत्रात वारंवार होणारा राजकीय हस्तक्षेप अशा अनेक कारणांमुळे ऑलंम्पिक स्पर्धेत यश मिळविण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी शासनाने क्रिडा धोरणाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करुन शहरी भागाबरोबरच ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत क्रीडाक्षेत्राच्या विकासाकरिता प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

घरी राहुन जागतिक ऑलंम्पिक दिन साजरा 

आज कोरोनामुळे कमी अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम झाला आहे. यातून क्रीडा क्षेत्रही सुटले नाही. यावर्षी जपानमधील टोकियो येथे होणाऱ्या ऑलंम्पिक स्पर्धा कोरोनाच्या आपत्तीमुळे २०२१ पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वीच्या १९१६, १९४० व १९४४ मधील ऑलंम्पिक स्पर्धा पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द झाल्या करण्यात आल्या होत्या.  त्यानंतर आज भारतासह सर्व जग कोरोनाशी कडवी झुंज देत असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे जागतिक ऑलंम्पिक दिवस साजरा करता येणार नाही. मात्र, आपल्याला परिवारासह घरी बसून लहान मोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून वातावरण निर्मितीत जागतिक ऑलंम्पिक दिन साजरा करुन कोरोनाला परभुत करावे लागणार आहे.
-प्रा. डॉ. प्रमोद वाघमारे (क्रीडा प्रशिक्षक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com