असं जगता आले तर बरं होईल, कसे? ते वाचाच 

File photo
File photo

नांदेड : प्राणायाम आणि नामस्मरण केल्याने मानसिक समाधान लाभते; पण जीवनावश्यक सेवा आणि वस्तूंसाठी पैसाच मिळविणे आवश्यक ठरते. संकट काळात आपण जेव्हा काम करू शकणार नाही, त्या काळात उपयोगी पडेल, इतकी पुंजीची तरतूद केल्यास वृध्दापकाळात फायदा होतो. लेकरांनी भरणपोषण करण्यास नकार दिल्यानंतर अनेक वृध्दांचे बेहाल होत असतात, यातून धडा घेऊन काही तरी उपाय केलाच पाहिजे.

पैशासोबतच लागतात प्रेमाची माणसं
पैशाबरोबरच प्रेमाची चार माणसं लागतात. प्रेम जिव्हाळा काही बाजारात मिळत नाही, म्हणून माणसाला  सकारात्मक माणसांची गरज लागते. विशेषतः मनापासून नि:स्वार्थपणे  प्रेम आणि अडचणींच्या वेळी मदत करणारी माणसं आवश्यक ठरतात. यासाठी सेवा, प्रेम, सन्मान, सुसंवाद आणि योग्य मार्गदर्शन करून अनेक माणसं जोडली पाहिजे. त्यातली चार-दोन जरी प्रत्यक्ष मदतीला आली तर खूप आधार मिळतो.

विधायक मार्गाचाच अवलंब करावा
ज्यांना नेतृत्व करायचे आहे, निवडणुका जिंकायच्या आहेत. मानसन्मान मिळवायचा आहे त्यांनी असंख्य माणसं जोडायला हवीत. जलसंपदा जितकी आवश्यक आहे तितकेच महत्त्वाचे जनसंपदेला जपले पाहिजे. ज्यांना जपू शकलो नाही ते तापू शकतात. कोणतेही काम यशस्वी करण्यासाठी केवळ एकट्याने प्रयत्न करून उपयोगाचे नाही. आपण आपल्यापरीने इतरांच्या क्षमता, कौशल्य आणि शहाणपणाचा उपयोग करून घेतले पाहिजे.  पण काहीही मिळवताना विधायक कार्य आणि विधायक मार्गाचाच अवलंब करणे फायदेशीर ठरेल.

विधायकतेशिवाय विशेषतः सज्जनांच्या दुनियेत व्यक्ती वैभवशाली मानली जात नाही. बेकायदेशीरपणे वाटचाल  घात करते. भौतिक, बाह्य वैभवापेक्षाही किती तरी अत्यंत आवश्यक असते, ते  म्हणजे आंतरिक वैभव. हे वैभव नसेल तर  मानसिक समाधान, शांतता अन् गाढ झोप लागत नाही. हे वैभव नसेल तर पैशाच्या गादीवर  झोपेच्या गोळ्या, दारू पिऊन तळमळत पडण्याची वेळ येते. झोप नसेल, मानसिक समाधान नसेल तर आरोग्य उत्तम राहूच शकत नाही. हळूहळू अनेक आजार येतात. म्हणून गाढ झोप, मनाची प्रसन्नता गमावेल, अशी कोणतीच कृती आणि उक्ती होणार नाही, यासाठी  विशेष दक्ष राहिले पाहिजे.

मन मोठं असायला पाहिजे
आपल्या संदर्भात दुस-याने काही चुका केल्या असतील तर स्वत:ला समजावून सांगून मन मोठं करून त्यांना माफ केले पाहिजे. व्यक्तीला संपवून टाकण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेले दोष दूर करणे, मनोमन माफ करून वाटचाल करणेच फायदेशीर ठरते. माफ केल्याशिवाय आपल्या हातून कळत नकळत चूक झाली असेल तर मनमोकळेपणाने माफी मागून मनावरचं ओझं उतरून टाकलं पाहिजे.

आपलं मन समाधानी, आनंदी, उत्साही आणि प्रसन्न ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोन उपकारक ठरतो, याची जाणीव ठेवून वाटचाल करणे नितांत गरजेचे असते. योगसाधना, विपश्यना, सकारात्मक ग्रंथाचे वाचन, चिंतन, मनन, संगीताचा आस्वाद उपकारक ठरतो. ध्येयहिन प्रवास नसावा. विशिष्ट आणि विधायक ध्येयपूर्तीसाठी सातत्याने कार्यमग्न राहणं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत करते. मोह, लोभ, अविवेकी विचार आणि अज्ञानाने कधी कधी चुकीचे काही होऊ शकते, असे होणार नाही यासाठी दक्ष राहणे आवश्यक असते.

तनामनाला उत्तम आहाराजी गरज
मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले पाहिजे. योगासने प्राणायाम, ध्यान, विपश्यना साधनेसाठी किमान एक तास  दिला पाहिजे. सेवा, सत्संग, वाचन, संगीत याचा आपल्या दिनचर्येत अंतर्भाव करणे उपकारक ठरते. शरीर स्वस्थ राहण्यासाठी  तनामनाला उत्तम आहार देणे अत्यंत गरजेचे असते.
- डॉ. हनुमंत भोपाळे, समुपदेशक नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com