गोदावरीचे पावित्र्य राखा, अन्यथा गय नाही...असा इशारा कोणी दिला? वाचा...

नांदेड महापालिकेत सोमवारी आमदार बालाजी कल्याणकर यांनी आढावा बैठक घेतली.
नांदेड महापालिकेत सोमवारी आमदार बालाजी कल्याणकर यांनी आढावा बैठक घेतली.

नांदेड - शहराला वळसा घालून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे पावित्र्य आहे. गोदावरी नदीतील पवित्र पाण्याने नित्यनियमाने गुरुद्वाराची स्वच्छता करण्यात येते. परंतु शहरातील घाण पाणी गोदावरी पात्रात मिसळून दुषीत झाल्यामुळे काही दिवसापूर्वी माशांचा मृत्यू झाला. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे गोदावरी नदी स्वच्छ ठेवा, अन्यथा गय केली जाणार नाही, असा इशारा नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

नांदेड महापालिकेमध्ये सोमवारी (ता. २२) दुपारी आयुक्तांच्या उपस्थितीत शहरातील विविध समस्या व प्रश्नावर आमदार बालाजी कल्याणकर यांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह उपायुक्त विलास भोसीकर, सुधीर इंगोले, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्यासह अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. 

गोदावरी नदीतील प्रदूषण थांबवा
तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी १८ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यानंतरही गोदावरी नदीचे शुद्धीकरण का झाले नाही? असा प्रश्‍न आमदार कल्याणकर यांनी उपस्थित केला. तसेच उलट गोदावरी नदी अधिक प्रमाणात दूषित होऊन जवळपास तीन टन मासे मृत्यू पावले. ही बाब गंभीर आहे. शहरातील घाण पाणी गोदावरी नदीत मिसळत असल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची चर्चा असून या बाबीला जबाबदार कोण? असा प्रश्न आमदार कल्याणकर यांनी उपस्थित केला. 

नाल्या, ड्रेनेजचे घाण पाणी थांबवा
गुरुद्वाराचे पावित्र्य राखण्यासाठी गोदावरी नदी ही शुध्द असली पाहिजे. गोदावरी नदी प्रदूषित होणार नाही. यासाठी शहरातील नाल्या व ड्रेनेजचे घाण पाणी गोदावरी नदीत जाणार नाही, याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात. यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही श्री. कल्याणकर यांनी सांगितले. कोरोना आणि लॉकडाऊन काळामध्ये शहरात प्रतिदिन २५० टन कचरा आला कुठून? त्यामुळे प्रशासनाने घनकचरा उचलण्याच्या वजनाच्या बाबतीत दक्ष राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महत्वाची कामे प्राधान्याने करा
शहरातील जीवितहानी टाळण्यासाठी रस्त्यावरील उघड्या चेंबरवर तातडीने झाकणे बसवा. पाण्याचा मुबलक साठा असल्याने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करा. बंद पडलेले विद्युत दिवे सुरु करा. रस्त्यावरील खड्डे बुजवा. मॉर्निंग वॉकसाठी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत विसावा उद्यान सुरु करा. पावसाळ्यात रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात व कामचुकार अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार कल्याणकर यांनी दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com