आमदार, खासदारांसह अनेकजण धावले शेतकऱ्यांच्या मदतीला

file photo
file photo

नांदेड - सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला आता आमदार, खासदारांसह अनेकजण धावले आहेत. बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवर आणि कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी वेळेवर पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरवात केली आहे. कोरोना आणि लॉकडाउनचा काळ असतानाही शेतकऱ्यांनी बि बियाणे आणि खते खरेदी करुन पेरणी केली. मात्र, नांदेड शहर आणि जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर ते उगवले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला असून त्याला दुबार पेरणीच्या संकटाला  सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मदतीला जिल्ह्यातील आजी माजी आमदार, खासदारांसह लोकप्रतिनिधी धावले आहेत. 

शेतकऱ्यांना मोफत खत, बियाणे द्यावे - खासदार चिखलीकर 
बनावट बियाणे विक्रेते आणि कारखानदार यांच्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने मोफत खत व बियाणे पुरवठा करावा, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यामार्फत राज्य सरकारकडे केली आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शिवाय त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. बनावटी बियाणे तयार करणारे आणि उगवणक्षमता याची हमी देणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे.   

फौजदारी गुन्हे दाखल करा - खासदार हेमंत पाटील
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागात सोयाबीनचे बियाणे पेरणी करूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. यामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांशी खासदार हेमंत पाटील यांनी सवांद साधला. कोरोना आणि दुबार पेरणीच्या संकटाने हैराण असलेल्या शेतकऱ्याने आपली व्यथा खासदार पाटील यांच्यासमोर मांडून न्याय द्यावा, अशी मागणी केली. यावेळी खासदार पाटील यांनी बोगस बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक भूमिका घेतली.

कंपन्यांवर कारवाई करा - आमदार राजूरकर 
शेतकऱ्यांना पेरणीसाठी सोयाबीनचे बोगस बियाणे देऊन कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा बोगस बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषद प्रतोद आमदार अमर राजूरकर यांनी केली आहे. कोरोनाची लागन होत असताना सुद्धा शेतकऱ्यांनी या परिस्थितीला तोंड देत बी - बियाणे व खतांची खरेदी केली. शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा पुरवठा करणे ही बाब गंभीर आहे.  या बाबत सोयाबीन कंपन्यांविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समिती व कृषी विभाग यांच्याकडून लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सोयाबीन उत्पादक कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राजूरकर यांनी केली आहे. 

ग्राहक मंचाकडे दाद मागा - डी. पी. सावंत
मागील काही वर्षांपासून वेगवेगळया कारणांनी अडचणीत सापडलेल्या  जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे एक नवे आर्थिक संकट उभे टाकले आहे. या संदर्भात शासन योग्य ती कारवाई करेलच परंतु तत्पूर्वी शेतकऱ्यांनी बोगस बियाणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्याविरुध्द ग्राहक मंचाकडे दाद मागावी, असे आवाहन जिल्हयाचे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी केली आहे. सोयाबीनचे बियाणे खरेदी करणारा प्रत्येक शेतकरी हा संबंधित कंपनी व विक्रेते यांचा ग्राहक आहे. यामुळे ग्राहक  हक्क कायद्यानुसार नुकसान भरपाई मागण्याचा संपूर्ण अधिकारी शेतकऱ्यांना आहे. तसेच शेतकऱ्यांचे नुकसान देण्याची जबाबदारी संबंधित बीज उत्पादन कंपनीची आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ग्राहकमंचामध्ये तक्रार नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. ही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना या बाबतीत मोफत कायदेशीर सल्ला व इतर संपूर्ण मदत देण्यात येईल, असेही श्री. सावंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com