
Nanded : विकास प्रभागातील सर्वच नागरिकांपर्यंत पोहचावा ; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
नांदेड : जिल्ह्यासह शहरातील अनेक विकासकामे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच सत्तातंरानंतर आपण मंजूर केलेल्या मनपाच्या १५० कोटींच्या कामांना शिंदे -फडणवीस यांच्या सरकारने दिलेली स्थगिती उठवली. आता या कामांनाही प्रारंभ होणार आहे. केलेला हा विकास प्रभागातील सर्वच नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
शिवाजी नगर भागात शुक्रवारी (ता.२७) शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित हाथ से हाथ जोडो अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमर राजूरकर,
माजी मंत्री डी.पी.सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, रेखा पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मीनल खतगांवकर, कोषाध्यक्ष विजय येवणकर, माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, मसूदखान, अब्दुल गफार, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सेवादलाचे शिवाजी धर्माधिकारी,
हरिभाऊ शेळके, माजी नगरसेवक संदीप सोनकांबळे, दुष्यन्त सोनाळे उपस्थित होते. अशोक चव्हाण म्हणाले की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेस देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. भारत जोडो यात्रेच्या माध्यमांतून राहुल गांधीं यांनी शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेची प्रश्न जाणून घेत त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी करोडोचा निधी आणला. आताच्या सरकारने मनपाच्या १५० कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती उठवली. आपण मंजूर करून आणलेल्या कामाचे आता हे नारळ फोडून आम्हीच कामे करीत आहोत हे भासवण्याचा प्रयत्न विरोधक करतील. गाफील राहू नका, असेही चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. सूत्रसंचालन देवराये यांनी केले.
सामुदायिक प्रयत्नाची गरज
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रे नंतरची यशस्वी यात्रा म्हणजे भारत जोडो यात्रा आहे. वातावरण निर्मिती झाल्याचा फायदा कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत होईल. मात्र देरे हरी पलंगावरी असे होणार नाही. आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जनतेचा विश्वास पाहता आगामी सर्व निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर व्यक्त केला.