नांदेड : वाईबाजारमध्ये मोबाइल नेटवर्क प्रॉब्लेम सुटता सुटेना, फोरजीच्या पॅकेजमध्ये टुजीही मिळेना

file photo
file photo

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : व्यापार पेठ व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या वाई बाजार व सर्कलमध्ये सध्या मोबाइल नेटवर्किंगची समस्या जटील बनली आहे. येथे देशभरातील नामांकित कंपन्यांचे मोबाईल मनोरे असून अडचण नसून खोळंबा बनले आहे. पॅकेजप्रमाणे सेवाशुल्क भरणा केल्यानंतरही सेवा मात्र मिळत नसल्याने व्यापारी, नागरिकांसह विद्यार्थीही आता चांगलेच वैतागले आहेत. इंटरनेटच्या फोरजी स्पीड नेटवर्कची हमी असताना साधे टूजी नेटवर्क ही व्यवस्थित मिळेना तर कॉलिंगच्या बाबतीत महानायक अमिताभ बच्चनचे तेवढे संवाद ऐकून झाल्यानंतर लगेच कॉल कट होत असल्याने परिसरातील मोबाईल ग्राहक चांगलेच बेजार झाले आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन गरजांमध्ये मोबाईलचा समावेश झाल्यापासून संपूर्ण व्यवहार मोबाईलवर अवलंबित झाले आहे. लोकांना एक वेळेचं जेवण नाही मिळालं तर चालेल परंतु मोबाईल अत्यावश्यक बाब बनले आहे. मागील तीन महिन्यांपासून येथील जिओ, आयडिया, वोडाफोन व व्हेंटिलेटरवर शेवटची घटका मोजत असलेले बीएसएनएलही त्यांच्या जाहीर केलेल्या सेवा देण्यात असमर्थ ठरत आहे. जिओने सुरवातीला मोफत इंटरनेटचे गाजर दाखवून आता इंटरनेट पॅकेजच्या किमतीत भरमसाठ वाढ केली. लोकांना इंटरनेट सवयीचा भाग आणि नित्याची गरज बनल्याने वाढीव दर हे स्वीकारले. परंतु या दरांच्या तुलनेत इंटरनेट व अखंडित कॉलिंग सेवा मोबाईल कंपन्या देत नाहीत. २९९ पासुन सातशे ते आठशे रुपयाचे बॅलन्स रिचार्ज करुनही फोरजी इंटरनेट सुविधा पुरवली जात नाही. एवढेच काय तर साधी टूजी सेवाही व्यत्यय शिवाय नाही. 

वाई बाजार येथे सुरुवातीला चार मोबाइल कंपनीचे मनोरे कार्यान्वित होते. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळेपासून सर्वच शैक्षणिक संस्थानी ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा अवलंब केल्याने वाई बाजारसारख्या ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्क सुविधा राम भरोसे झाल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले. व्यापार्‍यांचा व्यापार ठप्प तर खंडित इंटरनेट सेवेमुळे हरेक व्यवहारात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोबाईल कंपन्यांच्या बकवास सेवेमुळे मागील आठवडाभरात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची आपबीती वाई बाजार येथील व्यापारी मजर पठाण, तन्मय जाधव, दादाराव रामजोग, शेतकरी द्रोणसिंग जाधव आदींनी बोलून दाखविली आहे. मोबाईल कंपन्यांनी येथील मोबाईल ग्राहकांची अडचण सोडवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करुन हायस्पीड मोबाईल इंटरनेट व अखंडित नेटवर्क सेवा देऊन मेहरबानी करावी अशी मागणी त्रस्त नागरिक करत करत आहे.

वाई बाजार परिसरातील सर्वच कंपन्यांचे मोबाईल नेटवर्किंग टॉवर सेवा देण्यात अपयशी ठरले आहेत. खाजगी मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएल ची सेवा कशीबशी तग धरु लागली होती. परंतु त्यांनाही नेटवर्क गुलचा आजार लागला आहे. तक्रार ऐकण्यासाठी कोणीही तयार नसल्याने आता तक्रार थेट भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणकडे करणार आहे.
- डॉ. बाबा डाखोरे, किसान सभा, वाई बाजार.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com