Nanded : सततच्या पावसाने उरलेले सोयाबीन मातीमोल

कुरुळा मंडळातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
Soybean
Soybeansakal
Summary

कुरुळा मंडळातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

कुरुळा : मागील दोन वर्षांची पुनरावृत्ती लहरी निसर्गाकडून होत असून अनेक संकटाच्या मालिकेनंतर काढणीसाठी येणारे उरले सुरले सोयाबीनही सततच्या पावसामुळे मातीमोल होताना दिसत आहे.

त्यामुळे वर्षभराची मेहनत आणि सोयाबीनसाठी झालेला लागवड खर्चही निघणार नसल्याच्या शक्यता बळावली असून कुरुळा मंडळातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होतानाचे चित्र आहे.

कुरुळा महसूल मंडळात यंदाच्या हंगामात जवळपास ४० टक्के शेतीक्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली होती. जेमतेम आर्थिक आधार देणारे पीक म्हणून सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले होते. परंतु हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन पिकावर कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी यासह ‘यलो मोझाईक’ रोगाचा प्रादुर्भाव आशा संकटातून जावे लागले.

जून महिण्यात पावसाचा खंड आणि त्यानंतर जुलै महिन्यातील अतिवृष्टी, ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाची दीर्घ उघडीप यामुळे सोयाबीन पिकाची म्हणावी तशी वाढ झाली नाही. साधारण जमिनीवरील पिके तर पावसाअभावी पूर्णतः करपली. तर सरतेशेवटी सोयाबीन परिपक्व होण्याअगोदरच पाने पिवळी पडून शेंगाभरणी झाली नाही.

दरम्यान अंतरमशागतीसाठी अडथळे निर्माण झाले, तणनियंत्रणास मर्यादा आल्या होत्या. अडथळ्यांची शर्यत पार करत कसे बसे लागवड खर्चाला गवसणी घालू अशी शेतकऱ्यांची धारणा होती. परंतु मागील आठवडाभरापासून अचानक होत असलेल्या जोरदार पावसामुळे राहिलेले सोयाबीनही मातीमोल होताना दिसत आहे.

एकीकडे वाढत्या महागाईमुळे मजुरांचे भाव वधारले असल्याने शेतीतून घरी काय न्यायचे असा दुःखी प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. यातूनच सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने हताश शेतकरी आता आर्थिक आधाराच्या प्रतीक्षेत आहे.

दीपावलीपूर्वी आर्थिक आधार मिळेल का?

जुलै महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह उभी पिके बाधित झाली होती. ओहोळगतच्या जमिनी खरडून गेल्या होत्या. सखल भागात पाणी साचून पिके पिवळी पडून वाढ खुंटली होती. ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्याने राज्य सरकारने एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती.

ठिकठिकाणी अभिनंदनाचे बॅनरही लावण्यात आले होते. बॅनर फाटले परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही आला नाही. दीपावली पूर्वी तो आर्थिक आधार मिळेल का? यासह २५ टक्के विमा परतावा मिळणार होता त्याचेही काय झाले? असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com