Video - बोगस बियाणेप्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक, कुठे ते वाचा...

Nanded News
Nanded News

नांदेड : यंदा मृग नक्षत्रात मान्सुनचे आगमन झाल्यामुळे खरिप हंगाम वेळेत सुरू झाला. दमदार व पेरणीयोग्य पावसामुळे शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ ठेवत खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या. पण पावसाच्या प्रतिक्षेत लॉकडाउन कालावधीत शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणारे बियाणे खरेदी केले.

सोयाबीनच्या बोगस बियाणामुळे पेरणी होऊन पंधरवाडा लोटला तरी मातीआड झालेल्या बियाणांना अंकुर फुटला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीसह पेरणी खर्च वाया गेला. कपाळावर हात मारत शेतकरी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे दाद मागत आहेत. 

वेळेवर मान्सुनचे आगमन झाल्याने खरिप हंगाम चांगला साधणार या आशेवर कोरोनाच्या भयान संकटाला न जुमानता शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केली. पण सुगीच्या दिवसात गरजू शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणाचा पुरवठा करण्यात झाला. बियाणे कंपनीचे बनावट लेबल लाऊन बाजारात दाखल झालेल्या सोयाबीनचे बोगस बियाणे डोळ्यात धुळफेक करत माथी मारण्यात आले. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउन कालावधीत सवलतीमुळे शेतकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या दारात रांगेत उभे राहून बियाणे खरेदी केली. 

मान्सुन पुर्व पावसाच्या आगमनामुळे मृग नक्षत्रापूर्वीच जिल्ह्यात यंदा पेरणीपुर्व मशागती पूर्ण झाल्या. कोरोना महामारीमुळे लॉकडाउनमुळे काही प्रमाणात मशागती खंडित झाल्या. पण हवामान बदलामुळे लॉकडाउनमध्ये सवलत मिळताच शेतकऱ्यांनी पेरणीपुर्व मशागती उरकुन घेतल्या. मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच जोरदार पावसाचे आगमन झाले. पेरणी योग्य पावसामुळे सोयीनुसार शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ ठेवली. 

खरिपाचे मुख्य पिक समजले जाणारे सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्यामुळे पेरणी होऊन पंधरवडा लोटला तरी मातीआड झालेल्या बियाणांना कोंब फुटला नाही. त्यामुळे जमिनीत उपयुक्त ओलावा असताना बियाणाची उगवन होत नसल्याने कपाळावर हात मारत शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे धाव घेत आहेत. पेरणी, मशागतीच्या मेहनतीसह बियाणाचा खर्च मातीत गेल्याने दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला शेतकरी आधिच आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यातच कोरोना महामारीच्या गंभीर संकटाची भर पडली. 

जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीला पायंदळी तुडवत शेतात राबविणाऱ्या शेतकऱ्यांची सोयाबीनच्या बोगस बियाणातून फसवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदतीची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शहरातील नवीन मोंढा परिसरातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून जून (ता.११) गुरुवारी कामळज (ता.मुदखेड) येथील संतोष खानसोळे यांनी पिशवीवर इगल कंपनीचे लेबल असलेल्या सोयाबीन बियाणे खरेदी केलेले बियाणे जून (ता.१३) शनिवारी पेरले. मात्र, अद्याप त्याची उगवन झाली नाही. 

पेरलेले सोयाबीन बियाणे बोगस असल्याचे लक्षात येताच किमान नुकसान भरपाइसाठी श्री. खानसोळे यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्याचे दुकान गाठले. बियाणाची मागणी करत नुकसान भरपाइसाठी पुढील प्रक्रीयेची विनंती करणाऱ्या श्री.खानसोळे यांनी संभाजी ब्रिगेडचे संकेत पाटील यांना फोनवरुन माहिती दिली. त्यानुसार श्री.पाटील हे कार्यकर्त्यांसह संबंधीत कृषी निविष्ठा विक्रेता दुकानामध्ये दाखल झाले.

शेतकरी श्री.खानसोळे यांच्यासह दुकानदाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर बोगस बियाणाच्या माध्यमातून श्री.खानसोळे यांची फसवणूकीचा प्रकार समोर आला. बियाणाच्या बदल्यात दर्जेदार बियाणे देऊन नुकसान भरपाइसाठी पंचनाम्यासाठी संबंधित कंपनी, कृषी विभागाकडे पाठपुरावा करण्याचे विक्रेत्याने मान्य केले. येत्या दोन दिवसात शेतकऱ्याच्या बांधावर पंचनामा करुन पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची खात्री संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com