पडझड झालेल्या गावात मानवतावादी विचारांची पेरणी, कशी? ते वाचाच

Nanded News
Nanded News

नांदेड : नैतीक मूल्यांची पडझड झालेल्या गावात मानवतावादी विचारांची पेरणी करणारा ‘गावमातीचे अभंग’ हा काव्यसंग्रह कवी बाबाराव विश्‍वकर्मा यांनी लिहिला आहे. हा काव्यसंग्रह मोडकळीस आलेल्या गावाला नवीन चेतना व उर्जा प्रदान करणारा आहे.

योजना प्रभावीपणे राबवाव्यात
भारत देश कृषिप्रधान असल्यामुळे येथील ७८ टक्के जनता ही ग्रामीण भागात वास्तव्य करून राहते. या ७८ टक्के लोकांना आरोग्यविषयक जागरुक करणं व त्यांच्यात स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. अस्वच्छता म्हणजे ‘रोगांचे माहेरघर आहे’ हा विचार त्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे. त्यातूनच त्यांचे वैयक्तिक व सामाजिक आरोग्य सुधारेल व स्वतःच्या जीवनाकडे ते निकोप दृष्टीने बघतील.

यातून प्रत्येक गाव स्वच्छ, सुंदर व स्वावलंबी होईल. त्याच्या मनात पिढ्यानपिढ्या वास्तव्य करून राहणाऱ्या अंधश्रद्धा, बुवाबाजी व खुळचट विचारांना तिलांजली देऊन ‘एक आदर्श खेडेगाव’ निर्माण होईल, यासाठी केंद्र सरकारसह महाराष्ट्र राज्य वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. त्यापैकीच एक ‘स्वच्छ भारत अभियान’ ही योजना आहे. परंतु, ही योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याने ग्रामीण जीवन दिवसेंदिवस दुषीत होत चालले आहे. 

मानसिक समुपदेशनाची आहे गरज
आज बरीच गावे संपूर्ण स्वच्छता अभियानात सहभागी होतात. पुरस्कारही मिळवतात; पण एकदा का पुरस्कार मिळाला की सर्व काही संपले, अशा अविर्भावात गावकरी व लोकप्रतिनिधी वावरताना दिसून येतात. मग त्या निर्मल गावांचीही हागणदारी पुन्हा नव्याने मुक्त करण्याची वेळ येते. यासाठी ग्रामपातळीवरील ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडीताई, बचतगट सदस्या, प्रतिष्ठित नागरिक, सामान्य नागरिक या सर्वांना मानसिक समुपदेशनाची गरज आहे.

हे देखील वाचलेच पाहिजे - शेतशिवारांनी नेसला हिरवा शालु -

एका गावावरून होते देशाची परीक्षा
आजही ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याची आवश्‍यकता आहे. आरोग्य समस्या, व्यसनाधिनता, अंधश्रद्धा, शिक्षणाबद्दल अनास्था, भांडणे, राजकीय कलह ठाण मांडून आहेत. या सर्व समस्यांतून खेडेगाव मुक्त झाले पाहिजे. तरच भारत देशाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल. त्यासाठी खेडे सक्षम, निकोप व निरोगी राहणे गरजेचे आहे. जशी एका व्यक्तीवरून कुटुंबाची ओळख होते तसेच एका कुटुंबामुळे गावाची, व एका गावावरून देशाची, समाजाची परीक्षा केली जाते.

खेड्यांच्या विकासासाठी पेटून उठावे
देशाला, समाजाला सत्यम, शिवम व सुंदरम कसे करावे वाटत असेल, तर आपणास प्रथम भारतातील खेड्यांच्या आचार, विचारांत बदल घडवून नवीन पुरोगामीविचारांची प्रगत खेडे बनविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी मनस्वी झटून, पेटून उठले पाहिजे.
- बाबाराव विश्‍वकर्मा टाकळगावकर, नांदेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com