Video : आपल्याच गावात रोजगाराच्या संधी शोधा, परिस्थितीचा सदुपयोग करा

nanded news
nanded news

नांदेड : राज्यातील मोठ्या शहरात गेलेल्या अनेकांना कोरोनामुळे तसेच लॉकडाउनमुळे अनेकांना नौकऱ्या गमवाव्या लागतील, लागल्या असतील. परिणामी, अनेकजण गावी परत आले आहेत. त्यांनी पुन्हा मोठ्या शहरात जाण्यापेक्षा आपण ज्या भागात राहतो, त्या परिसराचा अभ्यास करुन उद्योग, व्यवसायाची निवड करावी आणि आलेल्या संधीचा सदुपयोग केल्यास त्यास नक्कीच यश येईल, असा विश्वास जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक किरण जाधव यांनी व्यक्त केला. 

नांदेड हा क्षेत्रफळाने तसेच सर्वाधिक तालुके असलेला मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यातील किनवट, बिलोली, अर्धापूर अशा विविध तालुक्यांची वेगळी ओळख आहे. त्यामुळे या भागात कच्चा मालावर आधारित प्रक्रिया उद्योग करण्यासाठी मोठी संधी आहे. नेमक्या या संधीचा फायदा स्थानिक युवकांना घेता आला पाहिजे. 

उद्योग व्यवसायातून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावे 
कुठलाही देश, राज्य आणि जिल्हा परिपूर्ण नसतो. एखादी वस्तू तयार करण्यासाठी त्या जिल्ह्यात सर्वच साधनसामग्री उपलब्ध असेलच असे नाही. तेव्हा छोट्या छोट्या उद्योग व्यवसायातून युवकांनी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. किनवट हा आदिवासी बहुल भाग असल्याने या भागात बांबुचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. बांबुपासून नवीन वस्तू तयार करण्याची कला अवगत केली पाहिजे. भारतीय कलेची जोड देऊन तयार केलेल्या या वस्तूंना जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण करता येणे शक्य आहे. 

भातशेतीतून निघणाऱ्या तांदळावर प्रक्रिया करावी 
बिलोली- तेलंगणाच्या सिमेला लागुन असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. भाताच्या प्रजातीची लागवड करुन त्यावर प्रक्रिया करुन तांदुळ तयार केला जातो. परंतु, याचा सर्वाधिक फायदा तेलंगणातील लोक घेतात. त्यामुळे भातशेती जरी नांदेड जिल्ह्यात होत असली तरी, त्याचा प्रत्यक्ष लाभ इतर राज्याला होतो. तो फायदा आपल्याला मिळाला पाहिजे यासाठी युवकांनी अभ्यास करुन भातशेतीतून निघणाऱ्या तांदळावर प्रक्रिया केली पाहिजे. यातून चांगले उत्पन्न मिळेल शिवाय हाताला रोजगार सुद्धा मिळेल.

केळी उत्पादनामुळे अर्धापूर तालुक्याची देखील वेगळी ओळख आहे. कच्या केळीवर प्रक्रिया करुन त्यापासून विविध प्रकारच्या खाद्य वस्तूंची निर्मिती करणे शक्य आहे. या शिवाय केळीच्या बांध्यापासून धागा निर्मिती, द्रोन, पत्रावळी, कागद तयार करणे अशा प्रकारचे अनेक लहान मोठे उद्योग व्यवसाय करणे शक्य आहे. परंतु, हे करण्यापूर्वी आपल्या भागात असलेल्या कच्च्या मालाची उपलब्धता आणि तयार केलेल्या मालाला बाजारपेठ याचा अभ्यास केल्यास उद्योग व्यवसायात येणाऱ्या तरुण उद्योजकांना नक्कीच फायदा होईल असे मत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक किरण जाधव यांनी व्यक्त केले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com