नावात ‘गांधी’ असूनही गांधीनगरवर अन्याय...

loha.jpg
loha.jpg

लोहा, जि.नांदेड ः निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठी आश्वासने देणाऱ्या राजकीय नेत्यांसह प्रशासनाच्या भूलथापांना बळी पडलेल्या गांधीनगर (धनोरा मक्ता, ता. लोहा) येथील नागरिकांचा जीवघेणा प्रवास यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा सुरू झाला आहे. सव्वाशे उंबरठे असलेल्या या वस्तीला चिखलात फसलेले रस्ते व नदीतील जीवघेणा प्रवास पाचवीलाच पुजलेला आहे. गेल्या ३० वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच महिने वस्तीतच अडकून पडावे लागत असल्यामुळे बाह्यजगताशी त्यांचा संपर्क तुटतो. त्यामुळे विदर्भातील गडचिरोलीचा प्रत्यय येतो, अशा संतापजनक भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.

गांधीनगरवासीयांच्या पदरी निराशा
येथील दत्तात्रय माटोरे, संभाजी नागरगोजे, सुरेश नागरगोजे यांनी प्रशासनासह राजकीय पातळीवर ऐंशीवर निवेदने देऊनही केवळ खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याशिवाय हाती काहीही लागले नाही. गांधीनगर वस्तीतील नागरिकांनी डांबरी रस्त्यासाठी अनेकदा आमरण उपोषणाचा मार्गदेखील अवलंबिला; मात्र गोड बोलून वेळ मारून नेण्याशिवाय गांधीनगरवासीयांच्या पदरी काहीही पडले नाही.


नदीपात्रात जीवघेणे खड्डे
मागील वर्षी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी कच्चा रस्ता करून देण्यासाठी पुढाकार घेतला. सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाने संपूर्ण रस्ता चिखलात फसला आहे. सर्वांत धोकादायक म्हणजे नदीवर पूल नाही. त्यामुळे नदीला पूर आला तर पाण्याचा प्रवाह पाहून डोळे फिरतात. अनेकदा अशा प्रवाहित नदीच्या पाण्यातून मार्ग काढीत नागरिकांना धोका पत्करावा लागतो. काहींनी नदीपात्रातील वाळूचा उपसा केल्यामुळे नदीपात्रात जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरवर्षी पावसाळा आला की एखादे मोठे संकट आल्याचा अनुभव येथील रहिवासी अनुभवतात. जवळपास चार ते पाच महिने ते वस्तीमध्ये अडकून पडतात. एखाद्या आजारी व्यक्तीस दवाखान्यात आणायचे म्हटले तर बैलगाडीत आणावे लागते. मागील वर्षी येथील नागरिकांनी पक्का रस्ता, नदीवर पूल या मागणीसाठी नदीपात्रातच उपोषण आरंभिले होते. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतल्यामुळे नाइलाजाने प्रशासनाकडून कच्चा रस्ता बनविण्यात आला. पुलाच्या बाबतीत कोणतीही कार्यवाही झाली नाही.


जिल्हा परिषदेअंतर्गत तीन किमी रस्ता येतो. गांधीनगर-धानोरा रस्ता हा कच्चा रस्ता गतवर्षी करण्यात आला. खास बाब म्हणून लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे मजबुतीकरण व पुलाची उभारणी केल्यास नागरिकांच्या कायमच्या समस्या सुटतील.
- विठ्ठल परळीकर, तहसीलदार, लोहा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com