पांदण रस्त्यातून मिळवून दिला शेतकऱ्यांना न्याय

nnd25sgp12.jpg
nnd25sgp12.jpg


कंधार, (जि. नांदेड) ः तहसीलदार तालुक्याचे मुख्य प्रशासनिक अधिकारी असतात. या मुळे त्यांच्याकडे कामाचा भरपूर व्याप असतो. ही कामे सांभाळत चौकटीच्या बाहेर येऊन जनतेला न्याय मिळवून देणारे तहसीलदार विरळच असतात. कंधारचे तहसीलदार विजय चव्हाण त्या पैकी एक आहेत. कारतळा (ता. कंधार) येथील गेल्या पन्नास वर्षांपासून रखडत पडलेला रस्त्याचा प्रश्न त्यांनी दोन दिवसात मार्गी लावून आपली छाप सोडली. पालकमंत्री पांदण रस्त्यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी रस्त्याची मुहूर्तमेढ रोवली. या मुळे कारतळा येथील ग्रामस्थांना न्याय मिळाला आहे. 


कारतळा (ता.कंधार) येथे १९७२ मध्ये साठवण तलाव तयार करण्यात आला होता. या तलावामुळे सिंचनक्षेत्रात वाढ झाली असली तरी तलावाच्या खालील भागातील शेतीस जाणारा रस्ता मात्र बंद झाला होता. यामुळे ग्रामस्थांसमोर अडचणीचा डोंगर उभा ठाकला होता. शेतकरी अडचणीतून मार्ग काढत कसेबसे ये-जा करीत. कालांतराने शेतीचे महत्व वाढले. त्यामुळे पडीत जमीन शेतीसाठी उपयोगात आणली जाऊ लागली. शेतीसाठी पर्यायी रस्त्याचा उपयोग होऊ लागला. इतर ऋतूत काहीतरी जुगाड करून शेतकरी ये-जा करत, परंतु पावसाळ्यात मात्र शेतकऱ्यांचे, महिला, लहान मुलांचे रस्त्याअभावी अतोनात हाल व्हायचे.

कंटाळून जनावरे गावात सुद्धा आणली नाहीत
रस्ता नसल्याने गाई, म्हशी, बैल इतर जनावरांना अक्षरशः पाण्यातून पोहून जावे लागायचे. विशेषतः शेती करीता साहित्यांची ने-आण करायची असल्यास ते ही पाण्यातूनच करावी लागायची. तसेच शेतातील माल सुद्धा बैलगाडी किंवा ट्रॅक्टर पाण्यातूच घेऊन जावे लागत असे. त्यात बसलेले माणसे अत्यंत धोकादायक पद्धतीने बसून जात. गुडघ्या एवढ्या चिखलातून माणसांना डोक्यावर चाऱ्याचा भारा घेऊन जाताना तर खुपच बिकट स्थिती निर्माण व्हायची. हिवाळ्याच्या दिवसात जनावरे पाण्यातून गेल्याने भिजत असत आणि मध्य रात्रीपर्यंत थंडीने कुडकुडत असत. काही लहान वासरे तर मयतही झाल्याचे गावकऱ्यांकडून समजले. काही शेतकऱ्यांनी तर मागच्या पाच ते सहा महिन्यापासून त्रासाला कंटाळून जनावरे गावात सुद्धा आणली नाहीत. 


नागरिकांनी रस्त्यासाठी केले उपोषण 
मागील काही दिवसांपूर्वी गावातील नागरिकांनी रस्त्यासाठी उपोषण केले. याची दखल घेऊन तहसीलदार चव्हाण यांनी गावाला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली आणि दोन किलोमीटर पालकमंत्री पांदण रस्त्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. परंतु काही शेतकऱ्यांनी या रस्त्यास विरोध होता. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी २१ ऑक्टोबरला तहसीलदार चव्हाण यांची भेट घेतली. चव्हाण यांनी दुपारनंतर कारतळ्याला भेट दिली आणि महसुली पद्धतीने रात्री १० वाजेपर्यंत थांबून तो रस्ता जेसीबीच्या सहाय्याने तयार करून घेतला. हा रास्ता झाल्याने विरोध करण्याऱ्या शेतकऱ्यांसह जवळपास दोनशे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

संपादन -  स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com