वेशीमधला वाद थेट पोहचला पोलिस ठाण्यात, काय आहे कारण?

File photo
File photo

नांदेड : गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे, न्यायालयाचा ससेमिरा थांबावा, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास कमी व्हावा, गावात शांतता व सुव्यवस्था नांदावी, यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून तंटामुक्त गाव समित्या उदयास आल्या. मात्र, सध्या या समित्यांचे काम थंडावल्याने वेशीमधील वाद थेट पोलिस ठाण्यामध्ये पोचत आहे.  

तंटामुक्त समित्यांची अमलबजावणी २०१४ पर्यंत प्रभावीपणे झाली. समितीचे काम बऱ्यापैकी चालले. मात्र नंतरच्या काळात शासनाने या समित्यांकडे दुर्लक्ष केले. परिणामी गेल्या सहा वर्षांपासून तंटामुक्त गाव समित्याचे काम थंडावले असून या समित्या नाममात्र ठरल्या आहेत. तंटामुक्त गाव समित्याची संकल्पना चांगली आहे. या समित्या गावाच्या समृद्धतेसाठी मैलाचा दगड ठरल्या होत्या. गावागावात तंटामुक्त गाव समित्या स्थापन झाल्यानंतर अनेक गवात त्याची प्रखर अमलबजावणी झाली. गावातील ग्रामसभेत तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यात येत होती. तसेच गावातील विविध क्षेत्रातील अनुभवी लोकांचा या समितीत अंतर्भाव केला जायचा. गावात लहान मोठे भांडण तंटे सोडविण्यासाठी लोक तंटामुक्त समितीकडे आशेने पाहू लागले.

अवैध्य धंद्यांवर बसला होता आळा
तंटामुक्त समिती वादी व प्रतिवादी यांना प्रत्यक्ष बोलावून व त्यांची बाजू समजून घेऊन न्याय निवाडा करीत होती. त्यामुळे गावातील तंटे पोलिस ठाण्यात न जाता ते गाव स्तरावर सोडविले जात होते. एकंदरीत तंटामुक्त समित्या या मिनी न्यायालय म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. गावच्या सरपंचानंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांचा मान मोठा होता. तंटामुक्त समित्यांमुळे गावातील तंटे तात्काळ सोडविले जाऊ लागले. गावात शांतता व सुव्यवस्था नांदायला सुरुवात झाली. गावातील अवैध धंद्यावर आळा बसायला लागला. अनेक गावाची तंटामुक्त होण्याकडे वाटचाल सुरु झाली. अनेक गावे तंटामुक्तही झाली.

पोलिस तक्रारी वाढल्या
गावातील तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावल्यामुळे गावातील भांडण, तंट्यांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात वाढल्या आहेत. शेतजमिनीचा वाद, घराची मालकी, कौटुंबिक वादाच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल होऊ लागल्या. पूर्वीच्या तुलनेत दोन वर्षांत तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.

नांदेड जिल्ह्यात २८ कोटींवर वाटप
नांदेड जिल्ह्यामध्ये एक हजार ३१३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी एक हजार २४८ ग्रामपंचायतींना २०१४ पर्यंत २८ कोटी ३३ लाख रुपये पुरस्काराच्या स्वरूपात वाटप झाले आहे. पहिल्याच वर्षी म्हणजे २००७-०८ या वर्षात ३८ गावांना ९० लाख ७५ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात आले होते. २०१५ पासून शासनाच्या दुर्लक्षामुळे पुरस्कार देणे बंद झाल्याने तंटामुक्ती समितीचे काम थंडावले आहे. 

चार वर्षांपासून पुरस्कारही बंद
गेल्या चार वर्षांपासून तंटामुक्त समितीला मिळणारे पुरस्कार बंद झाले आहेत. २०१५मध्ये सत्तापरिवर्तन झाल्याने तंटामुक्त गाव समितीकडे दुर्लक्ष झाले. शिवाय पुरस्कारही बंद आहेत. परिणामी तंटामुक्त समितीच्या कार्याला ब्रेक लागला आहे. 
- माधव अटकोरे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com