Video - नांदेड : लातूर-वारंगा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला एक जानेवारीपासून सुरुवात

Nanded News
Nanded News

नांदेड : नांदेड-लातूर रस्त्याची दुरावस्था झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देताच त्यांनी तत्काळ आदेश देत नांदेड-लातूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सांगितले. तसेच लातूर - वारंगा राष्ट्रीय महामार्गाच्या कामालाही एक जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सोमवारी (ता.१४) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

खासदार चिखलीकर म्हणाले की, नांदेड-लातूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. एमएपी कंपनीला हे काम देण्यात आले होते. यासाठी यश बॅंकेने गॅरंटी घेतलीहोती. परंतु तीच बॅंक बुडाल्यामुळे एमएपी कंपनीची निविदा रद्द करून के. टी. कन्स्ट्रक्शन कंपनीला वारंगा ते लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे नवीन वर्षात या कामाला प्रारंभ होत असल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी दिली. 

नांदेड-भोकर रस्त्यावरील आसना पुलाविषयी खासदार चिखलीकर म्हणाले की, कोण कशाचे श्रेय घेते, याकडे मी फारसे लक्ष देणार नाही. नागरिकांच्या सोयीसाठी हा राष्ट्रीय महामार्ग करण्यात येत आहे. सध्या काही लोकांना कामकाज नसल्यामुळे उठाठेव करत आहेत. त्याकडे मी लक्ष देणार नाही. वारंगा-लातूर हा राष्ट्रीय महामार्ग चांगला कसा होईल? याकडे आपले लक्ष राहणार आहे. 

लोहा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग पुर्णतः खराब झाला आहे. त्यासाठी येथील खड्डे न बुजविता नव्यानेच रस्ता करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेवून हा रस्ता तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही खासदार चिखलीकर यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार अविनाश घाटे, ओमप्रकाश पोकर्णा, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, मिलींद देशमुख, मारोती वाडेकर, अॅड. किशोर देशमुख, दिलीप कंदकुर्ते आदी उपस्थित होते.

एक देश एक बाजार
नवीन कृषी कायद्यामुळे ‘एक देश एक बाजार’ ही व्यवस्था तयार होणार असल्याने देशातील शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर जाण्यापासून आता कोणीही रोखणार नाही. शेतकरी सुधारला तर आता पुन्हा आपणाला सत्तेत जाता येणार नाही, अशी भिती विरोधकांना वाटत आहे. त्यामुळे कृषी कायद्याबद्दल बिनबुडाचे आरोप करून शेतकऱ्यांची  दिशाभुल केली जात असल्याचा आरोप खासदार चिखलीकर यांनी केली.  

कृषी कायदे शेतकरी हिताचेच
सत्तर वर्षात कॉंग्रेसने शेतकऱ्यांना प्रगतीच्या मार्गावर न आणता शेतकऱ्यांची फक्त फसवणूक केली. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे अस्तित्वात आणले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी कॉंग्रेस व विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये. कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीच असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com