अनुभव सातासमुद्रापारचे... : कठोर शिक्षेमुळे लॉकडाउन यशस्वी

Kartik-Mandot
Kartik-Mandot

ऑस्ट्रेलियात कडक शिस्तीमुळे लॉकडाउन यशस्वी झाले आहे. खूप मोठा दंड व शिक्षा असल्यामुळे येथे कोणीही नियम मोडण्याचा प्रयत्न करत नाही. एक किलोमीटरच्या बाहेर परवानगीशिवाय फिरताना कोणी सापडले तर सुमारे ८० हजार रुपये, क्वारंटाइनचा नियम मोडला तर सुमारे दहा लाखांचा दंड आहे. रुग्णसंख्या आटोक्‍यात आल्याने आता येथील व्यवहार सुरू होऊ लागले आहेत. मोटारीतून दोनच लोकांना प्रवास करण्याची परवानगी आहे.

वाहतुकीचे नियम येथे फार कडक आहेत. औषधे, किराणा व जेवण पार्सल आणण्यासाठी बाहेर पडता येते, पण एक किलोमीटरच्या आत. शक्‍य असलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा आदेश आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियात परदेशी नागरिक येऊ शकणार नाही. बेरोजगारी वाढू नये म्हणून येथील बांधकाम व्यवसाय चालू आहे. याशिवाय सुपर मार्केट, हॉस्पीटल, वाईन व औषध दुकाने, पेट्रोल पंप,  किराणा दुकाने चालू आहेत.  
ऑस्ट्रेलियात परदेशातून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात.

त्यांना सरकारकडून अकराशे डॉलर तर विद्यापीठांकडून अडीच ते तीन हजार डॉलर मदत देण्यात आली आहे. मात्र परदेशातून आलेल्या कामगारांना सरकारकडून काहीही मदत मिळालेली नाही. स्थानिक कामगारांना मात्र आठवड्याला ५५० डॉलर मिळत आहे. ऑस्ट्रेलियात सुमारे साडेतीन लाख परदेशी लोक राहतात. हे सर्व येत्या काही दिवसांत स्वदेशी परततील.

साताऱ्यातील तृप्ती क्षीरसागर यांनी मेलबर्न येथे हॉटेल चालू केले आणि थोड्याच दिवसात कोरोना आला. सध्या हॉटेल बंद आहे. मात्र क्षीरसागर आठवड्यातून दोन वेळा येथील भारतीय विद्यार्थ्यांना मोफत जेवण देत आहेत. भारतीय कामगारांना मदत करण्यासाठी भारतीयांच्या सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाने एक ॲप विकसित केले आहे. घरातून बाहेर पडताना नागरिकांनी मोबाईलमधील ब्लू टूथ चालू करायचे. या मोबाईलधारकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींमध्ये पुढील काही दिवसांत कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याला नोटीफिकेशन येते. तेवढ्या व्यक्तींना क्वारंटाईन केले जाते. क्वारंटाइनचा नियम मोडला तर दहा लाख रुपये दंड किंवा एक वर्षाचा तुरुंगवास.

भारतात सरकार नागरिकांसाठी खूप काही करत आहे. नागरिकांनी त्यास प्रतिसाद दिला पाहिजे. मला काही होणार नाही, या भ्रमात राहू नये. कोरोनाला सहज घेऊ नये. तो कोणालाही होऊ शकतो. कोरोनामुळे कुटुंबातील कोणी गेले तर नातेवाईक सांत्वन करण्यासाठी सुद्धा येत नाही. इतकी भयानक परिस्थिती आहे.
(शब्दांकन - रमेश वत्रे, केडगाव)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com