259 पेन्शनर्सचे 20 लाख घेतले परत

259 Retirees' Money Withdrawn From Account Kolhapur Marathi News
259 Retirees' Money Withdrawn From Account Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : तालुक्‍यातील संजय गांधी योजनेतंर्गत मयत, स्थलांतरीत झालेल्या 259 लाभार्थींच्या बॅंक खात्यावर वर्षानुवर्षे पडून असलेली 20 लाखाची रक्कम तहसील कार्यालयाकडून "रिव्हर्स' घेवून ती शासनाच्या खात्यावर वर्गही करण्यात आले. तहसील कार्यालयाने बॅंकेकडून माहिती मागितल्यानंतर हे चित्र समोर आले आहे. तसेच खरोखर लाभार्थी आहे आणि त्यांनी पेन्शन उचलली नाही, अशा लाभार्थींनी पेन्शन मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहनही तहसील कार्यालयाने केले आहे. 

तालुक्‍यात संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतंर्गत 9 हजार 741 लाभार्थींना पेन्शन मिळते. दर महिन्याला हे पेन्शन लाभार्थींच्या बॅंक खात्यावर वर्ग केली जाते. लॉकडाऊनमध्ये शासनाने ऍडव्हान्स पेन्शन देवून गरीबांना आधार दिला. दरम्यान, संबंधित बॅंक शाखेत अनेक लाभार्थी असे होते की त्यांनी अनेक महिन्यांपासून पेन्शनची उचलच केलेली नव्हती. एकेका लाभार्थींच्या खात्यावर, तर 20 हजारहून अधिक पेन्शनची रक्कम तशीच पडून होती.

या पार्श्‍वभूमीवर तहसील कार्यालयाने मयत आणि स्थलांतरीत झालेल्या लाभार्थींची माहिती मागविली. या चौकशीत बहुतांशी गावातून एकूण 259 लाभार्थी असे निष्पन्न झाले. बहुतांश लाभार्थी मयत झाल्याचे स्पष्ट झाले. मयताच्या वारसांना पेन्शनचा लाभ न देण्याच्या निर्णयामुळे ही रक्कम कोणालाही देता येत नाही. यामुळे ही रक्कम तशीच पडून होती. तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना विभागाकडून बॅंकांकडून तपशील मागितल्यानंतर ही रक्कम 20 लाखापर्यंत जात असल्याचे समजताच तत्काळ तहसील कार्यालयाने ही रक्कम परत घेण्याचा निर्णय घेतला.

बॅंकेने रक्कमेचा धनादेश तहसील कार्यालयाला दिला. या कार्यालयाने तत्काळ 20 लाख रूपये चलन करून शासनाच्या खात्यावर वर्गही केले. ही रक्कम एप्रिल ते जून पर्यंतचे आहे. जुलै व ऑगस्टचेही असे खातेदार शोधले जात आहेत. या प्रक्रियेत खरोखर पेन्शनचा लाभ न मिळालेल्या लाभार्थींनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. त्यातून आजअखेर (ता. 20) केवळ दोनच लाभार्थींचे अर्ज दाखल झाले आहेत. तहसील कार्यालयाने स्थानिक तलाठ्यांनाही गावागावात याबाबतची फेर चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. 

हयातीचे दाखले तलाठींकडे द्या 
लाभार्थींकडून वर्षातून एकदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात हयातीचे तर एप्रिलमध्ये उत्पन्नाचे दाखले घेतले जातात. पूर्वी हे दाखले संजय गांधी योजना विभागाकडे द्यावे लागत असे. नव्या शासन निर्णयामुळे आता हे दाखले स्थानिक तलाठ्यांकडे देण्याचे आवाहन तहसीलदार दिनेश पारगे व योजना विभागाचे अव्वल कारकून विकास कोलते यांनी केले आहे. लॉकडाऊनमुळे मुदत वाढविली असून असे दाखले ऑक्‍टोबरअखेर द्यावेत, असेही आवाहन केले आहे. 

परत घेतलेले पेन्शन 
- संजय गांधी व श्रावणबाळ लाभार्थी : 16 लाख 49 हजार 
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ लाभार्थी : 3 लाख 49 हजार 

पेन्शन अनावश्‍यक पडून होती
तालुक्‍यातील मयत आणि स्थलांतरीत लाभार्थींच्या बॅंक खात्यावर पेन्शन अनावश्‍यक पडून होती. ही रक्कम परत घेण्याचा निर्णय घेतला. 
- दिनेश पारगे, तहसीलदार

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com