ऊन, वारा पावसाचा सामना करत 45 वर्षांपासून एकाच हाताने शेती करणारा अवलिया

80 year old person farming work only one hand in 45 year in beglam
80 year old person farming work only one hand in 45 year in beglam

वडगाव (बेळगाव) : कर्जबाजारी, दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे खचलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारला आहे. मात्र, जिद्द व कष्टाच्या जोरावर ८० वर्षाचा शेतकरी एका हातावर तब्बल ४५ वर्षे शेतीकामासह अन्य कामे करत आहे. तो सायकलही चालवितो. महादेव अप्पया चतुर (वय ८०) असे या जिद्दी शेतकऱ्याचे नाव आहे.

श्री. चतुर हे १२ वर्षाचे असताना परसातील झाडावरील आंबे काढताना पडल्याने त्यांचा उजवा हात मोडला. जिल्हा रुग्णालयात हातावर तीन शस्त्रक्रिया झाल्या, पण हाताला गॅंगरिन होऊन जीवाला धोका निर्माण झाल्याने हात काढण्यात आला. मात्र ते खचले नाहीत. तीन महिन्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. काही दिवसातच त्यांना हे काम जमले. त्यांनी याच आधारावर दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिकत असतानाच शेतातील कामेही सुरूच होती.

गवत व भाताची गंजी घालणे यासह जनावरांची निगा राखण्याचे कामही केले. शिवाय सायकलवरून गवताचा भारा, लाकडे, भाताची पोती आणणे, दुधाचे वाटप करण्याचे काम केले. सायकलीवरुन काटगाळी (ता. खानापूर) पर्यंत जाऊन येत असत. तर शहापूर शिवारातील आणि हलगा येथील आपल्या शेतात जाऊन दररोज गवताचा भाराही आणत. तब्बल ४५ वर्षे हा त्यांचा दिनक्रम होता. मात्र, घरच्यांनी आग्रह केल्याने गेल्या दोन वर्षापासून ही कामे थांबविली आहेत. आजही रोज सायंकाळी सायकलीवरुन वडगावसह भाग्यनगर, हिंदवाडीपर्यंत जाऊन दूध देण्याचे काम सुरु आहे.

स्वत:च्या शेतासह इतरांच्या शेतातील कामेही श्री. चतुर यांनी केली आहेत. व्यायामशाळेत दंड, बैठका व व्यायाम केल्याने त्यांच्यापासून आजार थोडा लांबच आहे. आजही पहाटे ५ वाजता उठून थंड पाण्याने अंघोळ करण्याचा दिनक्रम सुरू आहे. त्यांना पोहताही येते. सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्यांच्या आयुष्यात सुमारे ५० वर्षे पत्नी सुमन यांनीही तितकीच साथ दिली आहे. श्री. चतुर यांच्या कार्याची दखल घेऊन येथील व्हिजन मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संस्थेतर्फे दिवाळीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

नकारात्मक विचार बदला

विविध कारणांमुळे खचलेल्या शेतकऱ्यांनी नकारात्मक विचार बदलून कष्ट करावेत, असा संदेश महादेव चतुर यांनी दिला आहे. यामुळे आत्महत्येचा विचार जरी मनात आला तर एकदा या एक हाताच्या शेतकऱ्याचे कार्य आठवल्यास आत्महत्येचे विचार नक्कीच बदलतील.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com