आजरा : चित्री प्रकल्पातून पहिले आर्वतन सुरू झाल्याने आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशीवरील 11 बंधारे तुडूंब झाले आहेत. या बंधाऱ्यात सुमारे 593 दसलक्ष घनफुट पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. ऊस पिकासह व उन्हाळी पिकांना याचा लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
यंदा चित्री प्रकल्पातून पंधरा दिवस उशीरा पाणी सोडले आहे. गतवर्षी 23 जानेवारीला पाणी सोडले होते. यंदा मात्र 7 फेब्रुवारीला पाणी सोडले. त्यामुळे यंदा पाण्याची बचत झाली आहे. या वर्षीही पावसाने चांगली साथ दिल्याने बंधाऱ्यात पाणीसाठा जानेवारीपर्यंत चांगला राहिला. त्यामुळे चित्रीतून पंधरा दिवस विलंबाने पाणी सोडण्यात आले आहे.
हिरण्यकेशीवरील आजरा तालुक्यातील कर्पेवाडी, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण या चार बंधाऱ्यासह गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापुर, गजरगाव, जरळी, हरळी, गिजवणे, निलजी, खणदाळ सात बंधाऱ्यात पाणीसाठा केला जात आहे. हे आर्वतन दोन दिवस सुरू राहणार आहे. यामुळे चित्री प्रकल्पावरील दोनही तालुक्यातील 6 हजार 500 हेक्टर जमिनीतील पिकांना याचा लाभ होणार आहे. या बंधाऱ्यांत 593 दसलक्ष घनफुट पाणीसाठा होणार आहे.
पिकांबरोबर हिरण्यकेशी नदीवर आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात चित्रीतून पाणी सोडले जाते. चार आर्वतने होतात. यंदा मात्र उशीरा पाणी सोडल्याने पाण्याची बचत झाली आहे. हे पाणी (ता.15) मार्चपर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरता येईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
आजऱ्यातील पाटबंधारे प्रकल्पात शिल्लक पाणी (दसलक्ष घनफुटमध्ये)
चित्री ः 1529, धनगरबाडी ः 59, खानापुर ः 13, एरंडोळ ः 129
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.