महाडिक रडणारे नाहीत तर लढणारे - अमल महाडिक

amal mahadik challenge to satej patil in gokul election kolhapur marathi news
amal mahadik challenge to satej patil in gokul election kolhapur marathi news

कोल्हापूर - कसबा बावड्यातील सुमारे ५१ हजार टन ऊस पुरवठा राजाराम कारखान्यास होत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुशल नेतृत्वावर विश्‍वास आहे. कारखान्याबाबत राज्यमंत्र्यांच्या खोट्या तक्रारीला कोणी भीक घालणार नाहीत. महाडिक हे रडणारे नाहीत तर लढणारे आहेत. त्यांनी निवडणुकीसाठी समोरासमोर यावे. आमची तयारी आहे, असे आव्हान माजी आमदार अमल महाडिक यांनी दिले.

त्‍यांच्या तक्रारीला भीक घालत नाही  

‘राजाराम’च्या १८९५ सभासदांच्या सभासदत्वावर आक्षेप घेण्यात आले. या आक्षेपावरील सुनावणी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सुरू आहे. या सुनावणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा मेळावा लक्ष्मीपुरीतील खाटीक समाजाच्या सभागृहात झाला. त्यावेळी श्री. महाडिक बोलत होते. ते म्हणाले, ‘‘छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना सर्वसामान्य शेतकरी सभासदांचा आहे. गरीब शेतकऱ्यांचा हा श्रीमंत साखर कारखाना आहे. 

त्यामुळे तो अबाधित राखण्यासाठी तुमची फक्त साथ व सहकार्य अपेक्षित आहे.’’ यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, ‘‘कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुंड पाठवून सभा उधळून लावण्याचा उद्योग बावड्यातील माणूस करत आहे; पण त्याला सभासदांनी थारा दिलेला नाही. बावड्यातील कारखाना बावड्याकडेच राहिला पाहिजे, या राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या व्यक्तीला येत्या निवडणुकीत सुज्ञ शेतकरी सभासद गाढल्याशिवाय राहणार नाहीत.’’
माजी अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, ‘‘राज्यमंत्री सतेज पाटील यांनी डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे चार हजार सभासद एका रात्रीत कमी केले आणि त्या कारखान्याचे खासगीकरण केले आहे. त्याच पध्दतीने राजाराम कारखाना ताब्यात घेण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. तो गावातील सभासद यशस्वी होऊ देणार नाहीत.’’
यावेळी गडमुडशिंगीचे सरपंच तानाजी पाटील यांचेही भाषण झाले. मेळाव्याला संचालक दिलीप उलपे, वसंत बेनाडी, शिवाजी पाटील, सुरेश पाटील, अरुण गायकवाड, विजय पाटील, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. 

तेवढे तक्रारदाराचे वयही नाही 

मी या साखर कारखान्याचा संस्थापक सभासद आहे. माझा सभासद क्रमांक आठ आहे. मी जितकी वर्षे ऊस पुरवठा करतोय, तेवढे तक्रारदाराचे वय नाही. त्यामुळे ही प्रवृत्ती उपटून टाकली पाहिजे, असा टोला सोन्याची शिरोली येथील शेतकरी हरी आबा चौगले यांनी लगावला.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com