इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे शेवाळाचे प्रमाण वाढत असल्याने पाण्याला हिरवट रंग आला आहे. नदी प्रवाहित न केल्यास पात्रातील पाणी प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होण्याची भीती आहे.
पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. विशेष करुन शिरोळ तालुक्यातील गावांना प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे. सध्या नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे पाण्यामध्ये शेवाळाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पाण्याला हिरवट रंग आला आहे. याशिवाय पाण्यामध्ये निर्माल्य मिसळत असल्यामुळे नदीघाट परिसरातील पाणी प्रदूषित होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या इचलकरंजी शहराला कृष्णा नदीबरोबरच पंचगंगा नदीतूनही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहरात एक दिवसआड पाणी दिले जाते. अद्यापही या पाण्याचा धोका नसल्याने पंचगंगा नदीतून उपसा करण्यात येत आहे. पण पुढील तीन-चार दिवसांत पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद झाल्यास शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पालिकेचा पाणीपुरवठा विभाग सतर्क झाला आहे. पाण्याची दररोज तपासणी केल्यानंतरच पुरवठा करण्यात येत आहे. सध्या तरी कोणताच धोका नसल्याचे सांगण्यात आले. पाटबंधारे विभागाकडून नदी प्रवाहित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. नदी प्रवाहित झाल्यास प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रदूषित घटक नाहीत
दररोज पंचगंगा नदीतील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतरच पाणी उपसा करण्यात येत आहे. सध्या तरी पाण्यामध्ये प्रदूषित घटक आढळलेले नाहीत.
- बाजीराव कांबळे, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.