सायंकाळ होताच हाळोली परिसरात भीतीची छाया

An Atmosphere Of Fear Due To Elephants In Haloli Area In The Evening Kolhapur Marathi News
An Atmosphere Of Fear Due To Elephants In Haloli Area In The Evening Kolhapur Marathi News

आजरा : सायंकाळ कडूस (संधी प्रकाश) पडू लागल्यावर हाळोली व मसोली या दोन गावच्या परिसरात भीतीची छाया दाट होऊ लागते. काड काडचा आवाज जंगल भरून जातो. त्यामुळे शेताकडे गेलेल्या शेतकरी महिला व पुरुषांना कधी गावी परतू असे होते. पाणंदीच्या वाटेवरून झपाझप पाय उचलण्याची जणू त्यांची स्पर्धाच सुरू असते. जरा जरी वेळ झाला, तरी काळं मोठं धूड कधी समोर येऊन उभं राहील याचा नेम नसतो. हे या काही वर्षातील या गावातील दररोजचे चित्र आहे. आजरा-आंबोली मार्ग परिसरातील हाळोली गावात तर एक शेतकरी नाही ज्याचे हत्तीमुळे नुकसान झालेले नाही. 

एक तपाहून अधिक काळ लोटला असून आजरा तालुक्‍यात नवखा असलेला जंगली हत्ती येथील जंगलाचा भागच बनून राहिला आहे. 10 जून 2006 ला टस्कर या परिसरात दाखल झाला. त्या पाठोपाठ हत्तींचे कळप येऊन जाऊ लागले, अन्‌ या काही वर्षांत या कळपातील नरांनी (टस्करांनी) आजरा तालुक्‍यातच ठाण मांडले आहे.

सह्याद्रीच्या दूरवर पसरलेल्या डोंगररांगातील चाळोबा जंगल परिसरात टस्कर राहुटी ठेवून आहे. सायंकाळ झाली की, जंगलातून उतरून शेतात पिकामध्ये धुडगूस घालणे, मनसोक्त खाद्य खाणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. चाळोबा जंगलाजवळील हाळोली व मसोली या गावांतील पिकांची गेली अनेक वर्षे तो धूळधाण उडवीत आहे. त्याच्या उपद्रवाने शेतकरी वैतागले असून सरकार व वन विभागाने जमिनी ताब्यात घेऊन शेतात पिकणाऱ्या उत्पादनाला बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. 

आजरा-आंबोली मार्गावर असलेले हाळोली चार गल्लींचे छोटे खेडे. ते चाळोबा जंगल परिसरात येते. या गावात सुमारे दीडशेचा उंबरठा आहे. या गावातील एकही जण हत्तीच्या उपद्रवापासून वाचलेला नाही. या गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचे टस्कर हत्तीने नुकसान केले आहे. याबाबत शेतकरी शिवाजी अमृते म्हणाले, ""या परिसरात सुमारे दहा वर्षे "टस्कर' तळ ठोकून आहे. यंदा तर या परिसरात दोन टस्कर होते. दररोज ते पिकात उतरत असून भात, ऊस, नागली, बांबू ही पिके फस्त करीत आहेत.

आठवडाभरापासून हे दोन टस्कर सध्या चाळोबा जंगलात नाहीत. एक जण भुदरगड परिसरातील पिंपळगावकडे गेला आहे, तर दुसरा किटवडे परिसरात आहे. त्यामुळे या आठवड्यात आम्हाला हायसे वाटले; पण हे काही दिवसांपुरते आहे. पुन्हा हे टस्कर या परिसरात येणारच आहेत. गेल्या चार-पाच वर्षांचा हा अनुभव आहे. त्यांच्या तडाख्यातून वाचलेली पिके तेवढी शेतकऱ्यांची. बाकी सारी त्यांचीच आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाच्या मदतीने त्यांना हुसकावून लावण्याचे बरेच प्रयत्न केले; पण त्यांना यश आलेले नाही. आमदार, खासदारांच्या मार्गदर्शनाखाली अनेकदा ग्रामस्थांच्या वनाधिकाऱ्यांशी बैठका झाल्या आहेत; पण अजून प्रश्‍न सुटलेला नाही.'' 

गवे बरे; पण हत्ती नको..! 
गव्यांकडून नुकसान मोठ्या प्रमाणात होत नाही; पण हत्ती एकदा पिकात उतरला की, खाणे कमी आणि तुडवून अधिक नुकसान करतो. कांडीला आलेले ऊस पीक ओढून खातो. त्यामुळे ते मुळासकट जमिनीतून बाहेर पडते. तेथे पुन्हा उसाच्या रोपाची लावण करावी लागते. त्यामुळे गवे बरे; पण हत्ती नको, अशी भावना संजय गुरव या शेतकऱ्याने व्यक्त केली. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com