कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ २३ वर्षे आमदार आणि १६ वर्षे मंत्री आहेत. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत. तरी त्यांना जिल्ह्यात राजकारण करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची मदत का घ्यावी लागते? कागल सोडाच, पण संताजी घोरपडे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात किती ग्रामपंचायती मुश्रीफांनी स्वबळावर जिंकल्या, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. ‘राष्ट्रवादी’च्या जिल्हाध्यक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची दयनीय अवस्था असा आरोप पत्रकातून केला होता. त्याला उत्तर म्हणून आज भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रक दिले.
पत्रकातील माहितीनुसार, राज्यात सत्ता नसतानाही भाजपने ३२५३ ग्रामपंचायती घेऊन पहिला क्रमांक राखला. मुश्रीफ यांना जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेनेची मदत का घ्यावी लागली, याचे उत्तर ए. वाय. पाटील यांनी मुश्रीफ यांनाच विचारावे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातही भाजपने चांगली कामगिरी केली. मुश्रीफ स्वतःला बडे नेते म्हणून घेतात मग शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीजबिल माफी दोन लाखांवर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी यावर काहीच का बोलत नाहीत. समरजितसिंह शेतकऱ्यांचे विषय घेऊन बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, उपाध्यक्ष नाथाजी पाटील, राहूल देसाई यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे.
ए. वाय. यांची फक्त सही
ए. वाय. पाटील यांना भाजपबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. भाजप प्रवेशासाठी ते मंत्रालयातील ९ अ दालनासमोर किती तरी वेळा बसले होते. त्यामुळे पत्रकातील भाषा त्यांची नाही. त्यांची केवळ सही आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.