कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात महाराष्ट्रातील एकही प्रश्न नव्हता. केवळ विरोधकांना शिव्याशाप देणारे ते भाषण होते. राज्यपालांसारख्या घटनाधिष्ठित पदाचाही सन्मान ठाकरे यांनी भाषणात ठेवला नाही. विरोधकांना शिव्या देणारे त्यांचे भाषण हे दसऱ्याचे नव्हते, तर शिमग्याचे होते, असा टोला आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘शिमग्याला आपण जे करतो ते मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याच्या भाषणात केले. त्यांचे भाषण म्हणजे केवळ विरोधकांना शिव्याशाप होते. शेतकरी कर्जमाफी, चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, अवकाळी पावसाने झालेले नुकसान, मराठा आरक्षण, शैक्षणिक वर्षाची सुरुवात यातील एकाही प्रश्नावर ते बोलले नाहीत. त्यांच्याजवळ अकरा महिन्यांच्या कारकीर्दीत सांगण्यासारखे काहीही नाही. राज्यपालांचाही सन्मान त्यांना ठेवता आला नाही. त्यांच्या भाषणाने मुख्यमंत्रिपदाचा गरिमा खालावला. आमच्यावर टीका केल्यावर जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. त्यामुळेच आम्ही त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.’’
नोंदणीवर मिळणार उमेदवारी
पदवीधर निवडणुकीबाबत पाटील म्हणाले, ‘‘विद्यमान आमदार नसेल तर ज्या जिल्ह्याची नोंदणी सर्वाधिक तेथील उमेदवाराला तिकीट मिळते. अजून नोंदणी संपलेली नाही. सुरुवातीला कोल्हापूरची नोंदणी सर्वाधिक होती; मात्र आता पुणेही लाखाच्या पुढे गेले आहे. अद्याप उमेदवारी निश्चित नाही.’’
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.