दिलासादायक ः "केडीसीसी'कडून शेतकऱ्यांचा दोन लाखांचा विमा

 Comfortable: Farmers get insurance of Rs 2 lakh from KDCC bank
Comfortable: Farmers get insurance of Rs 2 lakh from KDCC bank
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या 85 वर्षापर्यंतच्या सर्व सभासद शेतकऱ्यांना दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती विमा उतरला आहे. या विम्याच्या हप्त्याची 91 लाखाची रक्कम जिल्हा बॅंक नफ्यामधून भरणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

बॅंकेशी संलग्न सेवा संस्थांचे कर्जदार आणि बिगर कर्जदार असे दोन्ही प्रकारचे शेतकरी या योजनेत समाविष्ट आहेत, असेही श्री . मुश्रीफ यांनी सांगितले. अपघातांच्या या प्रकारांमध्ये रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू, वीज पडून झालेला मृत्यू, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा समावेश आहे. जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार 210 कर्जदार व बिगर कर्जदार सभासद शेतकऱ्यांना या विमा सुरक्षेचे कवच लाभले आहे. 
कायमचे आणि अंशतः अपंगत्व आल्यासही शेतकऱ्याला या योजनेमधून भरपाई मिळणार असल्याची माहिती श्री. मुश्रीफ यांनी दिली. 
या योजनेबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन स्पर्धात्मक निविदा मागवल्या होत्या. 85 वर्षापर्यंत विमासुरक्षा देणारी भारती एक्‍सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही कंपनी पुढे आली. आज विमा कंपनीला धनादेश देऊन सुरुवात केलेली आहे, याची मुदत एक वर्षापर्यंत आहे. बॅंकेला 135 कोटी रुपये ढोबळ नफा झाला आहे. त्यातूनच शेतकऱ्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही योजना आणली आहे. 
यावेळी बॅंकेचे संचालक आमदार राजेश पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने , प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास, सर्जेराव पाटील- पेरीडकर, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, उदयानीदेवी साळोखे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने व जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते. 

अशी आहे विमा योजना....... 
- सेवा संस्थाकडील दोन लाख 52 हजार 210 शेतकऱ्यांना लाभ 
- अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई 
- कायम अपंगत्व व अंशतः अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनाही भरपाई 
- बॅंकेनेच उचलला विमा हप्त्याचा भार 

........... 
शेतकऱ्यांना दिलासा 
बॅंकेने जुलै व ऑगस्ट 2019 मधील अतिवृष्टी व महापूर बाधित शेतकऱ्यांना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुक्रमे सात व सहा महिन्यांच्या व्याजाची 16 कोटी रुपये व्याजाची रक्कम बॅंक भरणार आहे. ऊस उत्पादकाशिवाय इतर शेतकरी जे भात, सोयाबीन, भुईमूग, कापूस इत्यादी पिकांसाठी कर्ज घेतात त्यांनाही रुपये एक लाखापर्यंतच्या कर्जास व्याज माफ आहे. एक लाखापासून तीन लाखापर्यंत कर्जाला फक्त दोन टक्के व्याज आकारणी केली जाते. शेतकऱ्यांचे हे व्याजही कोरोनामुळे बॅंकच भरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com