इचलकरंजी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या सक्रिय लाभार्थ्यांना आता गृहपयोगी 30 वस्तूंचा संच मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे दहा लाख लाभार्थ्यांना होणार आहे. या वस्तूंच्या वितरणास राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून नुकतीच मंजुरी दिली आहे. यापूर्वी बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी उपयुक्त अशा सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले होते. आता संसाराला उपयोगी पडणारे साहित्य मिळणार आहे.
बांधकाम कामगार हा सातत्याने स्थलांतरित करीत असतो. एका साईटवरील काम संपले की नवीन बांधकामाच्या ठिकाणी अगदी कुटुंबासह अनेक बांधकाम कामगार जात असतात. अशावेळी अनेक अडचणींचा या बांधकाम कामगारांना सामना करावा लागतो. अगदी निवासस्थानाची सोय, पाल्यांचे शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्या यांची मोठी गैरसोय होत असते, पण यातूनही या बांधकाम कामगारांच्या संसाराला वेगळ्या पद्धतीने हातभार लागण्यासाठी दैनंदिन उपयोगात येणारे साहित्य देण्याबाबत शासन पातळीवरून नुकताच निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये गृहपयोगी 30 वस्तूंच्या संचाचे वाटप केले जाणार आहे, मात्र यासाठी नोंदणीकृत सक्रिय कामगार याचा लाभ मिळणार आहे. जिल्हास्तरावर सहायक कामगार आयुक्त अथवा सरकारी कामगार अधिकारी याचे समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. विशेष म्हणजे वाटप करण्यात येणारे साहित्य दर्जेदार असण्यासाठी त्याची शासन मान्य संस्थेकडून तपासणी केली जाणार आहे. बऱ्यावेळा साहित्य वापटामध्ये गैरव्यवहार होण्याचा मोठा धोका असतो, पण खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी संच वाटप करताना छायाचित्र काढणे, बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
गृहपयोगी वस्तूमध्ये एकूण 30 वस्तू दिल्या जाणार आहेत. यामध्ये ताट -4, वाट्या -8, ग्लास-4, पातेले - 3, मोठा चमचा -2, जग -1, मसाला डबा -1, डबे -3, परात -1, प्रेशर कुकर -1, कढई - 1, टाकी - 1 या वस्तूंचा समावेश आहे.
दोन तालुक्यांत 9 हजार लाभार्थी
शिरोळ व हातकणंगले तालुक्यात सध्या 9 हजार नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार आहेत. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरवर्षी नूतनीकरण करण्यात येते, मात्र गेल्या वर्षभरापासून नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे अनेक बांधकाम कामगार या लाभापासून वंचित राहण्याची मोठी भीती आहे.
लाभार्थ्यांमध्ये नाराजीची भावना
पूर्वी लाभार्थ्यांच्या बॅंक खात्याते थेट रक्कम जमा होत होती. पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. याशिवाय थेट आर्थिक लाभ दिले जात होते. आता मात्र कल्याणकारी मंडळाकडून रक्कम देण्याऐवजी साहित्य देण्यावर भर दिला जात आहे. या धोरणाबाबत काही लाभार्थ्यांमध्ये नाराजीची भावना असल्याचे दिसून येत आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.