स्क्रीनिंग आणि सोशल डिस्टन्सिंगही; उपाययोजना करूनच होणार बोर्ड परीक्षा

corona screening and scanning use and board exam precautions in kolhapur
corona screening and scanning use and board exam precautions in kolhapur
Updated on

कोल्हापूर : एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षा केंद्रात या वर्षी कोणताही बदल होणार नाही. विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझरचा वापर अशा कोरोनाप्रतिबंधक उपाययोजना करूनच परीक्षा होतील. तिन्ही जिल्ह्यांत ५२२ केंद्रांवर या दोन्ही परीक्षा होतील. दहावीच्या परीक्षा केंद्रांची संख्या ३५५ तर बारावीच्या केंद्रांची संख्या १६७ आहे.

२३ एप्रिलपासून बारावीच्या तसेच २९ पासून दहावीच्या परीक्षेस प्रारंभ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे संकेत असले तरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. अभ्यासक्रमात कपात झाली तर परीक्षेच्या गुणांच्या मूल्यांकनात कोणताही बदल होणार नाही. दरवर्षी बारावी परीक्षेस फेब्रुवारीत तर दहावी परीक्षेस मार्चमध्ये सुरवात होते; मात्र या वर्षी शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू होण्यास उशीर झाल्याने दोन्ही परीक्षा लांबणीवर पडल्या. 

राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक परीक्षा कोल्हापूर विभागीय मंडळाच्या स्तरावर परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. परीक्षेचे नियम पूर्वीसारखे असतील. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग राखणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने मंडळाने तयारी सुरू केली आहे. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रीनिंग केले जाईल. तापाची काही लक्षणे आहेत का, हे स्क्रीनिंगद्वारे तपासले जाईल. सॅनिटायझरचा वापरही होईल.

पूर्वी केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची तपासणी, चप्पल तसेच अन्य साहित्य वर्गखोलीच्या बाहेर ठेवणे, अकरानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यावर निर्बंध, व्हिडिओ चित्रीकरण, कॉपी रोखण्यासाठी भरारी पथक अशा उपाययोजना केल्या जात होत्या. या वर्षी नियम कायम राहतील; मात्र प्राधान्यक्रम असेल तो कोरोनासंबंधीच्या उपाययोजनांनाच.

कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात अद्यापही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लॉकडाउन होता. बारावीची परीक्षा सुरळीत झाली होती; मात्र दहावीचा शेवटचा पेपर शिल्लक राहिला आणि मार्चमध्ये लॉकडाउनला सुरवात झाली. पेपर तपासणीची प्रक्रिया याच काळात पार पाडावी लागली. गेल्या वर्षीचा निकाल जुलैमध्ये जाहीर झाला.

"कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यात दहावी-बारावीची परीक्षा केंद्रे पूर्वीप्रमाणे असतील. परीक्षेस अजूनही अवधी आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर कोरोना रोखण्यासंबंधीच्या उपाययोजना आहेत त्या निश्‍चितपणे केल्या जातील."

- देविदास कुलाळ, प्रभारी सचिव, कोल्हापूर विभागीय मंडळ

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com