कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत जमावबंदी लागू झाली. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री उशिरा नवे निर्बंध लागू केले. त्यानुसार हॉटेल, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, मॉल्स, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत बंद राहतील. हॉटेलमधील पार्सल सुविधा मात्र सुरू राहील. सार्वजनिक कार्यक्रमांनाही या कालावधीत मनाई असेल. त्याच वेळी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास ५०० रुपये आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
लग्न समारंभासाठी ५०, तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींनाच मुभा असेल, असे नव्या आदेशात म्हटले आहे. बंद काळात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल, याची दक्षता घेणे बंधनकारक असेल. अशा आस्थापनांमध्ये एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत. या नियमाचा भंग केल्यास प्रतिव्यक्ती हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सर्व एक-पडदा व मल्टिप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री आठ ते सकाळी सात बंद राहतील. मात्र, या वेळात टेक होम डिलिव्हरी आणि पार्सल सुविधा सुरू राहील. याचा कोणी भंग केल्यास संबंधित चित्रपटगृह, मॉल, उपाहारगृह, हॉटेल हे कोविड संसर्ग असेपर्यंत बंद करण्यात येईल. संबंधित आस्थापनाला दंडही ठोठावण्यात येईल.
कुठलेही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, मेळावे यांना परवानगी नाही. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सभागृह किंवा नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाहीत. घरीच विलगीकरण (होम आयसोलेशन) असल्यास कोणत्या डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत, त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवावी लागेल. गृह विलगीकरणात सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची राहील. रुग्णाने विलगीकरण नियमांचा भंग केल्यास संबंधित डॉक्टरवर त्याची माहिती लगेच स्थानिक प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी राहील. त्या डॉक्टरला अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाच्या उपचार व देखरेखीच्या कामातून मुक्त होता येईल.
नवे निर्बंध
० कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी तसा सूचना फलक लावण्यात येईल. गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.
० खासगी आस्थापनात (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्क्यांपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील.
शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालयप्रमुख कोविड परिस्थिती विचारात घेऊन उपस्थितीबाबत कर्मचारी संख्या निश्चित करतील.
० उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरू ठेवू शकते.
० शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांना अत्यावश्यक आणि तत्काळ कामांसाठीच परवानगी.
० कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार घरून काम करण्याची मुभा द्यावी.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.